पाणीसाठ्यात वाढ नाही

By Admin | Updated: July 31, 2014 00:46 IST2014-07-31T00:01:21+5:302014-07-31T00:46:23+5:30

जालना : या जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने लघू व मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यांतील पाणी पातळीत एक टक्का सुद्धा वाढ झाली नसल्याचे गंभीर चित्र आहे.

There is no increase in water supply | पाणीसाठ्यात वाढ नाही

पाणीसाठ्यात वाढ नाही

जालना : या जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न पडल्याने लघू व मध्यम प्रकल्पाच्या जलसाठ्यांतील पाणी पातळीत एक टक्का सुद्धा वाढ झाली नसल्याचे गंभीर चित्र आहे.
या जिल्ह्या या वर्षी पावसाळा लांबला. परिणामी खरिपाच्या पेरण्या सुद्धा खोळंबल्या. आता आॅगस्ट महिना उजाडतो आहे. परंतु पावसाचा पत्ता नाही. परिणामी संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस भिज पाऊस झाला. त्या पाठोपाठ चार दिवस ढगाळ वातावरण पसरले होते. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना मोठ्या उत्साहाने सुरुवात केली. दुर्दैवाने पुन्हा पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या ६१ टक्क्यांवरच खोळंबल्या आहेत.
जिल्ह्यात सात तालुक्यात पावसाचे प्रमाण विषम आहे. परतूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस तर बाजूच्या मंठा तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे. जुलै अखेरपर्यंत केवळ १०४. १५ मिलीमीटर एवढीच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे हे प्रमाण वार्षिक टक्केवारीच्या तुलनेत केवळ १६.९८ टक्केच एवढे आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प व ५७ लघू प्रकल्पांत १ टक्काही जलसाठ्यात वाढ झाली नाही. जिल्ह्यातील कल्याण गिरजा या प्रकल्पांत केवळ २.९८ टक्के पाणीसाठा आहे. कल्याण मध्यम प्रकल्प, धामणा मध्यम प्रकल्प व गल्हाटी मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी जोत्याखाली आहे. अप्पर दुधना प्रकल्प कोरडाठाक आहे. जुई प्रकल्पात केवळ ०.६१ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. सात मध्यम प्रकल्पात केवळ ४.४८ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील ५७ पैकी १७ लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. तर २३ प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली आहे. उर्वरित प्रकल्पांत केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २७ जुलै अखेरपर्यंतची ही पाणीसाठ्याची आकडेवारी आहे.(प्रतिनिधी)
शेकडो गावांवर टंचाईचे संकट
जिल्ह्यातील अप्पर दुधना प्रकल्प कोरडाठाक आहे. कल्याण मध्यम, धामणा मध्यम व गल्हाटी मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. कल्याण गिरजा २.९८ व जीवरेखात ०.८९ टक्के शिल्लक आहे. हा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असून, या सातही प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांमधून पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
नेर, राजेवाडी, बरंजळा, प्रल्हादपूर, रेवलगाव वाडी, चिंचखेडा, मांडी, रोहिलागड,कानडगाव, भातखेडा, धनगरपिंपरी, लासूर, मानेपुरी, तळतोंडी व बामणी हे लघू प्रकल्प कोरडेठाक आहेत. वाकी, दरेगाव, जामवाडी, नीरखेडा तांडा, कुंभेफळ, सोमठाणा, पिंपळगाव कोलते, चांदई एक्को, पळसखेडा, बाणेगाव, टाका, पानेवाडी, तळेगाव, चिंचोली, मांदाळा, पोखरी, पिंपरखेडा, शिरपूर, सारवाडी, परतवाडी, नागतास, हातडी या लघु प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे.

Web Title: There is no increase in water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.