११६ गावांत स्मशानभूमीच नाही !
By Admin | Updated: February 15, 2016 00:17 IST2016-02-15T00:02:02+5:302016-02-15T00:17:07+5:30
लातूर : स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, संरक्षण भिंत व वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे. मात्र जिल्ह्यातील ११६ गावांत स्मशानभूमीला जागाच नाही

११६ गावांत स्मशानभूमीच नाही !
लातूर : स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, संरक्षण भिंत व वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्याची योजना आहे. मात्र जिल्ह्यातील ११६ गावांत स्मशानभूमीला जागाच नाही. गायरान अथवा जमीन संपादित करून ती स्मशानभूमीला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायती आहेत. तर गावांची संख्या ९०० च्या पुढे आहे. त्यातील ११६ गावांमध्ये कोणत्याही समाजाची स्मशानभूमीच नाही. स्मशानभूमीला जागाही नाही. जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील तहसीलदार व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी स्मशानभूमी नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला आहे. लातूर तालुक्यातील १५, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १२, औसा तालुका २३, निलंगा ५, रेणापूर १५, अहमदपूर ३५, चाकूर १, देवणी, २, उदगीर ६, जळकोट २ अशा एकूण ११६ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. पारंपरिक जागेत अंत्यसंस्कार केले जात असले, तरी संबंधित जागेसंदर्भात सातबारा अथवा गाव नमुना ८ अ आदी कागदपत्रे स्मशानभूमीच्या नावे नाहीत. स्मशानभूमीची जागाच नसल्यामुळे या कागदपत्रांचा अभाव आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या गावांत स्मशानभूमीला जागा नाही, त्या गावांत गायरान जमीन देणे अथवा गायरान जमीन नसेल, तर भूसंपादन करून स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. प्राधान्याने या ११६ गावांच्या संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी संबंधितांना दिले आहेत. (प्रतिनिधी)