...तर समांतर विरोधात मतदान
By Admin | Updated: May 17, 2016 00:35 IST2016-05-17T00:20:54+5:302016-05-17T00:35:53+5:30
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीने नेहमीच ‘समांतर’ जलवाहिनीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पक्षाने कधीही औरंगाबाद वॉटर युटिलिटीच्या बाजूने कौल दिलेला नाही.

...तर समांतर विरोधात मतदान
अतुल सावे : आम्ही शिवसेनेसोबत नाही, जनतेसोबत आहोत
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीने नेहमीच ‘समांतर’ जलवाहिनीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पक्षाने कधीही औरंगाबाद वॉटर युटिलिटीच्या बाजूने कौल दिलेला नाही. महापालिकेच्या सभागृहात समांतरच्या मुद्यावर मतदान घेण्याची वेळ आल्यावर भाजप विरोधात मतदान करणार असल्याचे आज आ. अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना-भाजपची युती आहे. युतीमध्ये आम्ही सेनेसोबत आहोत. समांतरच्या मुद्यावर आम्ही जनतेसोबत राहणार असल्याचे नमूद करून सावे यांनी नमूद केले की, मागील आठवड्यात भाजपाने यू- टर्न घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, असे काहीच नाही. करारानुसार कंपनी काम करीत नसेल तर त्याची हकालपट्टी करायला हवी. करारात दुरुस्ती करून वेळेवर कंपनी काम करणार असेल तर काहीच हरकत नाही. मनपा प्रशासनाची या प्रकरणात वेळोवेळी भूमिका बदलत गेली आहे. आयुक्त बदलले तर प्रशासनाची भूमिका बदलते, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. शासनादेशानुसार मनपाने कंपनीला नोटीस बजावली. कंपनीने उत्तर दिले. आता प्रशासनाने आपली भूमिका सभागृहासमोर ठेवावी. मनपाकडे कोणतेही दुसरे पर्याय असतील तर ते सांगावे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून काम करून घेता येईल. केंद्र आणि राज्य शासनाकडून आणखी निधी आणता येईल, असेही सावे यांनी नमूद केले.यापूर्वीही भाजपने समांतरच्या विरोधात कशी भूमिका घेतली, याचा सविस्तर तपशील सावे यांनी नमूद केला. डीआय पाईप वापरण्याऐवजी एचडीआय पाईप वापरण्याची मुभा देऊन कंपनीला १५३ कोटींचा फायदा पोहोचविण्यात येत होता. हा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असताना भाजपने प्रखर विरोध केला.
युतीचाच निर्णय
समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद युटिलिटी कंपनीसोबत करार करताना युतीचेच नगरसेवक होते या प्रश्नावर सावे यांनी सावध भूमिका घेत पूर्वी काय झाले माहीत नाही. आम्ही समांतरला आधीपासून विरोध करीत आहोत, असा दावा केला.
एमआयएम मॅनेज होणारा पक्ष
औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने विविध राजकीय पक्ष, नगरसेवकांना मॅनेज करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केल्याचा आरोप एमआयएमकडून करण्यात आला होता. या मुद्यावर पत्रकारांनी सावे यांना छेडले असता ते म्हणाले की, एमआयएम हा स्वत: मॅनेज होणारा पक्ष आहे. विधानसभेत ‘भारत माता की जय’च्या विरोधात भूमिका घेता येते. समांतरच्या मुद्यावर आमदारांना बोलता येत नाही. एमआयएमच्या नगरसेवकांना जलवाहिनी टाकण्यासाठी पाईप कसे काय मिळतात हो...कंपनीकडून विविध कामे कोणी वाटून घेतली हे पक्षाच्या नेत्यांनी बघावे. कंपनीने वसुलीचे काम कोणाला दिले, अनधिकृत नळकनेक्शन शोधण्याचे कामही एमआयएमच्या मंडळींनी घेतले आहे. मॅनेज करणारे आकडे आमच्यापर्यंत आले नाहीत, असेही शेवटी त्यांनी नमूद केले.