दहा टक्केच विद्यार्थ्यांना आम आदमी शिष्यवृत्तीचा लाभ
By Admin | Updated: July 15, 2014 00:54 IST2014-07-14T23:56:20+5:302014-07-15T00:54:37+5:30
अमित सोमवंशी, उस्मानाबाद जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे ३० हजार ७२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असले तरी सद्यस्थितीत यातील केवळ २ हजार ५५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.

दहा टक्केच विद्यार्थ्यांना आम आदमी शिष्यवृत्तीचा लाभ
अमित सोमवंशी, उस्मानाबाद
जिल्ह्यात आम आदमी विमा योजनेचे ३० हजार ७२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक असले तरी सद्यस्थितीत यातील केवळ २ हजार ५५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात एलआयसीचा आयडी अडसर ठरत असल्याचे दिसत आहे.
या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंब प्रमुख, अडीच एकर बागायती किंवा ५ एकर कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन शेतमजुरांनाही या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विम्याच्या अंतिम मुदतीपूर्वी विमाधारकाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून ३० हजार रूपये दिले जातात. अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार व अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यास ७५ हजार, एक डोळा किंवा पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रूपये भरपाई दिली जाते. याच लाभार्थ्यांच्या पाल्यासाठी शासनाच्या वतीने आम आदमी शिष्यवृत्ती योजनाही सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ९ वी ते १२ वीत शिकणाऱ्या दोन मुलांना दरमहा शंभर रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी ३२ हजार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी ४०५ शाळा व महाविद्यालयामधून ३० हजार ७२८ पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तर २६ हजार १५८ विद्यार्थ्यांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. तर ४ हजार ९५७ विद्यार्थ्यांच्या डाटा एन्ट्रीचे काम अद्यापही बाकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ हजार २२८ पैकी १४ हजार १४९ विद्यार्थ्यांचा एलआयसी आयडी प्राप्त झाला होता. त्यातील १० हजार ५५८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव एलआयसीकडे पाठविण्यात आले होते. मात्र, २०१३ व २०१४ या वर्षात यातील केवळ २ हजार ५५७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली असून, आठ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज एलआयसीकडे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
पाठपुरावा करुनही यश मिळेना
जिल्ह्यातील आम आदमी विमा योजनेच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी एलआयसीकडे व शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरु आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने शिष्यवृत्ती रखडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली आहे.
पालकांचे
हेलपाटे सुरूच
गेल्या वर्षाची आम आदमी योजनेची शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक वारंवार शाळेत व महाविद्यालयात जाऊन
हेलपाटे मारत आहे. मात्र त्यांना संबधित शाळा व महाविद्यालय प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पालकातून संताप व्यक्त होत आहे.
डाटा एन्ट्रीच नाही
जिल्ह्यातील आम आदमी योजनेच्या ४ हजार ९५७ विद्यार्थ्यांचे आॅन लाईन डाटा एन्ट्री केलेली नाही. यात उस्मानाबाद तालुक्यातील ६८७, तुळजापूर ३७४, उमरगा ३ हजार २८९, लोहारा ३७०, परंडा १७७ तर वाशी तालुक्यातील ६० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.