दहा संघटनांनी दर्शवला विरोध
By Admin | Updated: June 23, 2014 00:24 IST2014-06-22T23:28:45+5:302014-06-23T00:24:36+5:30
वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दहा संघटनांनी दर्शवला विरोध
वसमत : नगर पालिकेने शहराच्या हद्दीत बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आजपर्यंत दहा संघटनांनी या निर्णयास विरोध दर्शविला आहे. जनतेच्या भावनेची दखल घेत माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी न. प. तील सत्ताधाऱ्यांना कत्तलखान्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कत्तलखाना निविदा प्रक्रिया रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.
नगरपालिकेने सर्व्हे नंबर ३९ वरील जागेवर कत्तलखाना उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. पालिकेत भाजपा- शिवसेनेची सत्ता आहे. व सध्या अध्यक्षपद भाजपाकडे आहे. असे असताना कत्तलखाना उभारणीचा निर्णय झाल्याने शहरातील नागरिक प्रचंड चक्रावून गेले आहेत. हा नियोजित कत्तलखाना होवू नये, पशुधन देशोधडीला लावण्याच्या या प्रकारास वसमतमधील नगरसेवकांनी पाठिंंबा देवू नये, अशी मागणी वाढत आहे.
कत्तलखान्याच्या विरोधात आजपर्यंत १० संघटनांनी दंड थोपटले आहेत. प्रशासनाकडे निवेदने सादर केली जात आहेत.
वसमत येथील गोवंश वाचवा कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन उपविभागीय कार्यालयासमोर सुरू केले आहे. तर श्रीकृष्ण मंदिर, महानुभाव आश्रम, श्री जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज श्री संप्रदाय तालुका सेवा समिती, जनहित मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक जागृत मंच, अॅड. संदीप भालेराव मित्रमंडळ, भ्रष्टाचार विरोधी समिती, राष्ट्रमाता सेवाभावी संस्था, गोहत्या विरोधी समिती, श्रीराम गोरक्षा दल आदी संघटनांनी कत्तलखान्याच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली आहे. नगर पालिकेला कत्तलखान्याची निविदा रद्द करण्यास भाग पाडू अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा अॅड. संदीप भालेराव यांनी दिला आहे. कत्तलखान्याचे समर्थक नगरसेवक व पदाधिकारी कोण आहेत, हे आता निविदा मंजूरीसाठी बोलाविलेल्या सभेतच स्पष्ट होणार असल्याने शहरातील नागरिक निविदा रद्द होतात की कत्तलखाना उभारणीसाठी सर्वांचे एकमत होते किंवा कसे? याकडे लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांच्या संतप्त भावना पाहता नगर पालिका प्रशासन व सत्ताधारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
कत्तलखाना होणार नाही
वसमत नगरपालिकेने कत्तलखान्यासाठी निविदा काढली असली तरी शहर व तालुक्यातील जनतेच्या भावना पाहता हा नियोजित कत्तलखाना होवू देवू नये व हा निर्णय रद्द करावा, अशा सूचना आपण नगराध्यक्ष व शिवसेना- भाजपाच्या सदस्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता वसमतमध्ये कत्तलखाना होणारच नसल्याची ग्वाही शिवसेनेचे माजीमंत्री
डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.