हिवाळ्यामध्येही तापमान वाढलेले; थंडीचा जोर ओसरला
By Admin | Updated: January 4, 2016 00:09 IST2016-01-03T23:21:26+5:302016-01-04T00:09:53+5:30
बीड : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी थंडीचा कडाका वाढला होता; मात्र आता तापमान पुन्हा हळूहळू वाढूू लागले असल्याने दुष्काळ जाणवू लागला आहे.

हिवाळ्यामध्येही तापमान वाढलेले; थंडीचा जोर ओसरला
बीड : गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी थंडीचा कडाका वाढला होता; मात्र आता तापमान पुन्हा हळूहळू वाढूू लागले असल्याने दुष्काळ जाणवू लागला आहे. मध्यंतरी वाढलेल्या थंडीमुळे उन्हाची तीव्रता कमी झाली; परंतु आता उन्हाळ्याप्रमाणे चटके बसू लागले आहेत.
डिसेंबर अखेरचा आठवडा हा सर्वाधिक थंडीचा म्हणून अनुभवला गेला. किमान तापमान १० अंशापर्यंत जाऊन पोहोचले होते. ग्रामीण भागात तर पहाटेच्या वेळी बाहेर पडणे कठीण झाले होते. थंडी वाढली असल्यामुळे अनेकांचे हाल झाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी बाराच्या सुमारास टोपी-गमछे घेऊन नागरिकांना बाहेर पडावे लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मिळालेल्या माहितीनुसार शनिवारचे कमाल ३०, तर किमान २५ अंश तापमानाची नोंद केली गेली. दुष्काळ पडला असल्यामुळे रुक्षपणा कायम जाणवत आहे. त्यात उन्हाची भर पडत चालली आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात फारशी थंडी नव्हती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात गारपीट झाली. यामुळे तापमान सामान्य होते. यंदा परिस्थिती बदलली आहे. थंडीचा जोर ओसरू लागला असल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. थंडीमध्ये थोडाफार चढ-उतार होत आहे. हा भाग वगळला तर दुपारी गरमी जाणवू लागते. सद्य:परिस्थिती पाहता पुढील काळात तापमान पुन्हा वाढू शकते. कारण दुष्काळामुळे पाण्याची कमतरता आहे, त्यातच झाडे तोडली जात आहेत. याचा परिणाम निसर्गावर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)