पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:02 IST2021-04-08T04:02:56+5:302021-04-08T04:02:56+5:30
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बी. ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमीस्टरच्या पहिला पेपरला विद्यार्थ्यांना लाॅगिनला तांत्रिक अडचणी आल्याने ...

पहिल्याच पेपरला तांत्रिक अडचणी, विद्यार्थ्यांना मनस्ताप
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बी. ए. प्रथम वर्षाच्या पहिल्या सेमीस्टरच्या पहिला पेपरला विद्यार्थ्यांना लाॅगिनला तांत्रिक अडचणी आल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी १० ते १ वाजेदरम्यान परीक्षा होती. मात्र, साडेबारा वाजेपर्यंत विद्यार्थी लाॅगीन करु शकले नव्हते. तर ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडल्याने पेपरला मुकावे लागणार या भीतीने ऑफलाईन परीक्षेसाठी महाविद्यालय गाठले तर आता पर्याय बदलता येणार नसल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट करुन परीक्षेच्या समन्वयकांना फोन करण्याचा सल्ला दिल्याचे विद्यार्थी म्हणाले.
कोरोनामुळे विद्यापीठाने परीक्षेसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेला पसंती देत तो पर्याय निवडला. सोमवारी परीक्षेसाठी १ तासाचा अवधी होता. १० ते १ वाजेच्या दरम्यान विदयार्थी ला १ तासात पेपर देणे अनिवार्य होते. १० वाजेपासून विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेच्या संकेतस्थळावर लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होतो. १२ वाजेपर्यंत काही विद्यार्थ्यांचे लॉगीन झाले नाही.
देवगिरी महाविद्यालयाचे विद्यार्थी सोमेश खेडेकर, तुषार गणकवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील प्राध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे मोबाईल व्यस्त येत होते. शेवटपर्यंत संपर्क झाला नाही. शेवटी १२ ते १ असा एक तास आम्हाला पेपर सोडविण्यासाठी बाकी होता. साडेबारा वाजता संकेतस्थळ सुरू झाले. त्या वेळेत काही विद्यार्थी लॉगीन झाले. त्यांना पेपर सोडवण्यासाठी १ तासाचा कालावधी असतानासुध्दा एका तासापेक्षा कमी वेळे मिळाला. जे विद्यार्थी पेपर सोडवत होते त्यांनी गोंधळून जाऊन वेळेच्या आत पेपर सबमिट केला. अखेर विद्यापीठाकडून १ ते २ असा एका तासांचा वेळ वाढवूनदिला.
---
मी अंध आहे. ऑफलाईन परीक्षेला लेखनिक मिळत नसल्याने ऑनलाईनचा पर्याय निवडला. मात्र, दिवसभर लाॅगीन झाले नाही. महाविद्यालयांच्या समन्वयकांनी मदत केली नाही. संपर्कच होत नाही आहे. आता बुधवारी पेपर आहे. त्याला तरी अडचण यायला नको. तांत्रिक अडचणी विद्यापीठाने दूर कराव्यात.
-अजय ढोबाळ, विद्यार्थी
--
आजपासून पेपर सुरू झाले. ऑनलाईन पर्याय निवडून पश्चाताप झाला. समन्वयासाठी ज्यांचे नंबर दिले. त्यांच्याकडूनही मदत मिळाली नाही. अखेर वैजापूरच्या महाविद्यालय समन्वयकांनी मदत केली. पहिल्या दिवशी दिवसभर तारांबळ उडाली होती. अशा प्रकारच्या अडचणी पुढच्या पेपरला येऊ नये म्हणून विद्यापीठाने उपयायोजना केल्या पाहिजेत.
-मधुरा दलाल, विद्यार्थिनी