शिक्षकांच्या बदल्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’
By Admin | Updated: May 22, 2014 00:10 IST2014-05-21T23:28:49+5:302014-05-22T00:10:36+5:30
बीड: जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षकांना दर्जावाढ देण्यात येणार होता. मात्र अनेक शिक्षकांची नावे यादीतून गायब झाली. त्यामुळे शिक्षकांनी एकच गोंधळ घातला.

शिक्षकांच्या बदल्यांना आचारसंहितेचा ‘ब्रेक’
बीड: जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी शिक्षकांना दर्जावाढ देण्यात येणार होता. मात्र अनेक शिक्षकांची नावे यादीतून गायब झाली. त्यामुळे शिक्षकांनी एकच गोंधळ घातला. दरम्यान, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे दर्जावाढ, समायोजन व बदल्यांची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण मंजूर पदे, सध्या कार्यरत असलेले शिक्षक तसेच अतिरिक्त शिक्षक यांचा ताळमेळ घालण्यासाठी बदली प्रक्रियेपूर्वी सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ देण्यात येणार होता. त्यासाठी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाभरातून शिक्षक आले होते, सभागृहाच्या बाहेर दर्जावाढसाठी पात्र शिक्षकांची यादी नोटीस बोर्डवर लावली होती. ही प्रक्रिया सुरू असताना अनेक शिक्षकांची नावे यादीत नसल्यामुळे शिक्षकांनी आक्षेप नोंदविला. त्यामुळे दर्जावाढ प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाला. हे सर्व सुरू असतानाच जिल्हा परिषदेमध्ये पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेचे पत्र येऊन धडकले. त्यामुळे ऐनवेळी संपूर्ण प्रक्रिया रोखावी लागली. दर्जावाढ झाल्यानंतर समायोजन व त्यानंतर बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार होती. परंतु आचारसंहितेमुळे आता या संपूर्ण प्रक्रियेला बे्रक लागला आहे. त्यामुळे शिक्षकांना निराश होऊन परतावे लागले. सुधारणा करू दर्जावाढ प्रक्रिया सुरू असतानाच आचारसंहिता लागू झाल्याचा फॅक्स आला. त्यामुळे प्रक्रिया ऐनवेळी थांबवावी लागली. दरम्यानच्या काळात ज्या शिक्षकांची नावे यादीत नाहीत ती समाविष्ट करण्यात येतील. या शिवाय आक्षेप मागवून आचारसंहिता संपल्यावर प्रक्रिया पार पाडण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) भास्कर देवगुडे यांनी दिली. (प्रतिनिधी) यादीही फाटली दर्जावाढ प्रक्रियेपूर्वी शिक्षकांची यादी लावणे आवश्यक होते. परंतु यादी उशिरा लावण्यात आली. त्यामुळे ऐनवेळी यादीतील नावे पाहण्यासाठी शिक्षक तुटून पडले. या गर्दीमध्ये शिक्षकांची यादी फाटली. दरम्यान, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख मुसा, राज्य सचिव श्रीराम आघाव यांनी दर्जावाढ प्रक्रियेतील प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध नोंदविला. त्यानंतर दर्जावाढ प्रक्रिया नियमानुसार घेण्याची मागणी लावून धरली.