शिक्षकांची कोरोना आजारपणाची देयके रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST2021-06-24T04:05:51+5:302021-06-24T04:05:51+5:30
प्रतिपूर्तीला विलंब : शिक्षक भारतीचे सीईओंना निवेदन --- औरंगाबाद : कोरोना काळात आजारपणावर झालेला खर्च परत मिळावा म्हणून जिल्हा ...

शिक्षकांची कोरोना आजारपणाची देयके रखडली
प्रतिपूर्तीला विलंब : शिक्षक भारतीचे सीईओंना निवेदन
---
औरंगाबाद : कोरोना काळात आजारपणावर झालेला खर्च परत मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात शिक्षकांना खेट्या माराव्या लागत आहेत. अनावश्यक पत्रव्यवहार करणे, मार्गदर्शन मागवणे, शिक्षण विभागाला उशिरा खर्चाचे निकष दाखवून देयके वित्त विभागात पाठवण्यासाठी विलंब घडवून आणणे आदी प्रकार सुरू केले आहेत. हे थांबवून तत्काळ प्रतिपूर्ती देण्याची मागणी शिक्षक भारतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून सादर केलेली देयके शिक्षण विभागात एकाच टेबलवर धूळखात पडून आहेत. प्रस्तावित पैकी २० शिक्षकांचा कोरोना काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झाला आहे. त्यांना ५० लाखांच्या विमा कवचाचा लाभ मिळाला नाही; मात्र उसनवारी करुन घेतलेल्या उपचाराचा हक्काचा खर्च मिळणेही अवघड बनले आहे. ही देयके तत्काळ निकाली काढण्याची मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, महेंद्र बारवाल, मच्छिंद्र भराडे, राजेश भुसारी आदींनी केली आहे.