शिक्षकांच्या बदल्या स्थगित
By Admin | Updated: May 20, 2014 01:07 IST2014-05-20T00:51:39+5:302014-05-20T01:07:47+5:30
जालना : जिल्हा परिषदेतअंतर्गत समुपदेशनाद्वारे कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेस सोमवारपासून प्रारंभ झाला.
शिक्षकांच्या बदल्या स्थगित
जालना : जिल्हा परिषदेतअंतर्गत समुपदेशनाद्वारे कर्मचार्यांच्या बदली प्रक्रियेस सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षकांमधून मुख्याध्यापकपदी पदोन्नती प्रक्रिया अगोदर घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संच मान्यतेनुसार अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांच्या संख्येपेक्षा शाळेवर जास्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन आणि सर्वसाधारण बदल्या (जिल्हास्तरीय विनंती व आपसी ) २१ मे रोजी निश्चित केलेल्या होत्या. मात्र शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया अगोदर घेण्यासाठी बदली प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी वित्त व आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या समुपदेशन पद्धतीद्वारे बदल्या करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता या बदली प्रक्रियेस प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. वित्त विभागातील तीन कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आरोग्य विभागाअंतर्गत झालेल्या बदली प्रक्रियेस सभापती वर्षा देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.डी. भगत यांचीही उपस्थिती होती. आरोग्य सेवक पुरूष ७, आरोग्य सेवक महिला ११, आरोग्य सहायक पुरूष ४ तर आरोग्य सहायक महिला या पदाच्या २ कर्मचार्यांच्या बदल्या पसंतीनुसार करण्यात आल्या. औषध निर्माण अधिकारी पदाचे पाच-सहा जण बदलीसाठी इच्छुक होते. मात्र त्यांना रिक्त असलेल्या ठिकाणांपैकी पसंतीचे ठिकाण न मिळाल्याने त्यांनी नकार दर्शविला. दरम्यान, यावेळी सभागृहाबाहेर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) सीईओंनी दाखविला पहिल्या दिवशी हिसका बदली प्रक्रियेत लुडबूड करणार्या काही संघटनांच्या पदाधिकार्यांना सभागृहाबाहेर काढून जि.प. सीईओ प्रेरणा देशभ्रतार यांनी आपला हिसका बदली प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दाखविला. आरोग्य विभागातील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी काही कर्मचारी संघटनांचे पदाधिकारीही तेथे बसलेले होते. प्रक्रिया सुरू असताना काहींनी लुडबूड करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सीईओ देशभ्रतार यांनी ‘ही प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार होत आहे, नियमबाह्य काही होत असेल तर सांगा’ असे म्हणत सभागृहात बदलीपात्र कर्मचार्यांनीच थांबावे, असे सांगून काही संघटनांच्या पदाधिकार्यांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना केली. बदल्या आणि आदेश सोबतच या बदली प्रक्रियेनंतर लगेचच संबंधित कर्मचार्यांना बदल्यांचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात आले. ही बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात आल्याची प्रतिक्रिया काही आरोग्य कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. मंगळवारी विविध आठ विभागांतील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया होणार आहे. यात बांधकाम, सिंचन, पशुसंवर्धन, कृषी, महिला व बालकल्याण, सामान्य प्रशासन, पंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.