टँकर बंद असल्याने शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी जलकुंभावर रांगा
By Admin | Updated: March 14, 2016 00:40 IST2016-03-14T00:21:54+5:302016-03-14T00:40:12+5:30
लातूर : लातूर मनपाने डोंगरगाव उच्च पातळी बंधारा, भंडारवाडी, माकणी प्रकल्पातील पाणी मोठ्या टँकरने आणून शहरातील जलकुंभात साठविले आहे.

टँकर बंद असल्याने शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी जलकुंभावर रांगा
लातूर : लातूर मनपाने डोंगरगाव उच्च पातळी बंधारा, भंडारवाडी, माकणी प्रकल्पातील पाणी मोठ्या टँकरने आणून शहरातील जलकुंभात साठविले आहे. त्यामुळे जलकुंभांवर गेल्या दोन दिवसांपासून शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी दिवस-रात्र रांगा लागल्या आहेत.
शहरातील गांधी चौक, बार्शी रोड, विवेकानंद चौकातील जलकुंभात गेल्या दोन दिवसांत २५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे ५० लाख लिटर्स पाणी संकलित केले आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून जलकुंभात हे पाणी टाकले आहे. परंतु, अद्याप छोट्या टँकरद्वारे त्याचे वितरण प्रभागनिहाय केले नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांनी आता जलकुंभावरच धाव घेतली असून, तेथून पाणी भरले जात आहे. गांधी चौकातील जलकुंभाच्या जलवाहिनीवरून पाणी भरण्यासाठी जुन्या बसस्थानकापर्यंत रांगा लागल्या आहेत. शिवाय, मनपाच्या गेटसमोरही पाणी भरण्यासाठी अशाच रांगा लागल्या आहेत.
विवेकानंद चौकातील जलकुंभावरही गंजगोलाईच्या पूर्व भागातील वस्त्यांतून नागरिक पाणी भरण्यासाठी येत आहेत. रात्रं-दिवस या तिन्ही ठिकाणी पाण्यासाठी रांगा आहेत. मनपा प्रशासनाने अद्याप प्रभागनिहाय टँकरचे वितरण केलेले नाही. पाणी संकलित करण्यासाठीच मनपाचे अधिकारी मोहिमेवर आहेत. भंडारवाडी, डोंगरगाव, माकणी येथील नागरिकांचा विरोध पत्करून मोठ्या क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी संकलित केले जात आहे. शहरातील सर्व जलकुंभात मोठ्या प्रमाणात पाणी साठविल्यानंतर छोट्या टँकरद्वारे शहरात वितरण करण्याचे नियोजन मनपाचे आहे. मात्र पाण्याची भीषण टंचाई असल्याने टँकरची वाट न पाहता नागरिक स्वत: जलकुंभावर जाऊन पाणी आणत आहेत.
गांधी चौकातील जलकुंभातील पाणी भरण्यासाठी रविवारी जुन्या बसस्थानकापर्यंत भरदुपारी तीव्र उन्हातही रांगा लागलेल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून या जलकुंभावर पाणी भरण्यासाठी रांगा आहेत. टँकरने पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे आणि विकतचे पाणी परवडत नसल्यामुळे सामान्य नागरिक जलकुंभावर तळ ठोकून आहेत. सायकल, रिक्षातूनही पाणी नेले जात आहे.