लाच घ्या आणि निर्दोष मुक्तही व्हा
By Admin | Updated: June 12, 2014 01:34 IST2014-06-12T01:22:53+5:302014-06-12T01:34:46+5:30
मुजीब देवणीकर , औरंगाबाद लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही राज्यातील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ‘लाच’ घेतच आहेत. कारण त्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही.

लाच घ्या आणि निर्दोष मुक्तही व्हा
मुजीब देवणीकर , औरंगाबाद
लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही राज्यातील काही शासकीय अधिकारी व कर्मचारी ‘लाच’ घेतच आहेत. कारण त्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही. लाच घेताना अॅन्टी करप्शनने पकडले तरी घरी बसून अर्धा पगार घ्यायचा आणि न्यायालयातून निर्दोष मुक्त होण्याचा अनोखा ‘फंडा’ भ्रष्ट मंडळींनी स्वीकारला आहे. मागील सहा वर्षांमध्ये राज्यात अॅन्टी करप्शन ब्युरोने तब्बल २ हजार १८७ जणांना रंगेहाथ पकडले. त्यातील १ हजार ७०९ आरोपी निर्दोष मुक्त झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये छोट्या-मोठ्या कारणांसाठी आजही राजरोसपणे लाच मागितली जाते. लाच न दिल्यास संबंधित व्यक्तीचे काम रखडून ठेवण्यात येते. नाइलाजास्तव अनेक जण इच्छा नसतानाही या भ्रष्ट यंत्रणेला बळी पडतात. भ्रष्टाचाराची ही कीड नष्ट व्हावी या हेतूने शासनाने राज्यात स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागातर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सापळा लावून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात येते.
२००९ ते २०१४ पर्यंत अॅन्टी करप्शन ब्युरोने २ हजार १८७ जणांना पकडले. त्यातील तब्बल १ हजार ७०९ आरोपी निर्दोष सुटले आहेत. निर्दोष सुटण्याचे हे प्रमाण सरासरी ३० टक्क्यांच्या आसपास आहे. न्यायालयात दोषारोपपत्रासोबत सबळ पुराव्यांची गरज असते. दोषारोपपत्रातील कच्चे दुवे शोधून आरोपी निर्दोष मुक्त होत आहेत. लाच घेताना तक्रारदार, पंच, साक्षीदार सर्वच असतात. नंतर हे न्यायालयात फितूर होणार नाहीत अथवा फितूर झाले तरी आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे देण्याचे कर्तव्य अॅन्टी करप्शन ब्युरोच्या तपास अधिकाऱ्यांचे आहे.
या विभागात अनेक वर्षे काम केलेले निवृत्त पोलीस अधिकारी दिगंबर गाडेकर यांनी सांगितले की, शंभरात ७० ते ८० आरोपी निर्दोष सुटतात. त्यामागे अनेक कारणे आहेत. एकट्या अॅन्टी करप्शन ब्युरोला दोष देण्यात काहीच तथ्य नाही.
फिर्यादी साक्षीदार फितूर होतात. न्यायालयात बोर्डावर केस लवकर येत नाही. त्यामुळे फिर्यादी साक्षीदारांचा उत्साह मावळतो. आरोपी निर्दोष सुटू नयेत म्हणून सापळा रचताना सर्व प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग करण्याचा विचार सुरू आहे. राज्यात अॅन्टी करप्शन विभागाचे एकूण ८ परिक्षेत्र आहेत. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि नांदेडचा समावेश आहे.
असे सुटले आरोपी
वर्षेआरोप सिद्धनिर्दोषटक्केवारी
२००९१०६३६०२३
२०१०६८२८५१९
२०११९०२९३२३
२०१२११८३७६२४
२०१३८०३०७२१
२०१४ ३६८८२९