गरजेनुसार उपाययोजना आखा

By Admin | Updated: February 9, 2015 00:45 IST2015-02-09T00:37:14+5:302015-02-09T00:45:35+5:30

लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात

Take action accordingly | गरजेनुसार उपाययोजना आखा

गरजेनुसार उपाययोजना आखा


लातूर : कोणत्या गावात कशाप्रकारची पाणीटंचाई आहे, त्या गावात कोणत्या उपाययोजना करण्याची गरज आहे, याचा अभ्यास करून उपाययोजना करण्यात याव्यात. शिवाय, प्रादेशिकस्तरावर काही योजना मंजुरीसाठी असतील, तर त्याचे प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी रविवारी येथे केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळी व पाणीटंचाईच्या कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना व सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी विभागीय आयुक्त दांगट म्हणाले, विहिरी, विंधन विहिरी व अन्य अधिग्रहण करताना त्या गावांत कोणती गरज आहे, याचा आढावा घेण्यात यावा. गरजेनुसार त्या गावातील पाणीटंचाईचे निवारण करावे.
नाला सरळीकरण, खोलीकरण करण्यासाठी शासनाकडे यंत्र उपलब्ध झाली आहेत. या यंत्राद्वारे जून अखेरपर्यंत गाळ काढण्याचे नियोजन करावे. काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करावेत. जलयुक्त शिवार अभियान, पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम आणि कृषी विभागाच्या जलसिंचन योजना प्रभावीपणे राबवून पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करावे, असे निर्देशही विभागीय आयुक्त दांगट यांनी दिले.
बैठकीला जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, अपर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील २०२ गावांचा समावेश आहे. या गावांतील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींना अभियानात सहभागी करून योजनांची अंमलबजावणी करावी. अधिकाऱ्यांनी योजना राबविण्यासाठी सर्व स्तरातील लोकांसोबत समन्वय साधावा. पाणलोट क्षेत्र विकास हा मुख्य उद्देश असून, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाची मूळ संकल्पना समजावून घेऊन कामे तात्काळ सुरू करावीत. तलावातील तसेच जलस्त्रोतांतील गाळ काढणे व काढलेला गाळ सर्व शेतकऱ्यांना देणे हे या अभियानात अभिप्रेत आहे. अभियानातील कामे पारदर्शक होण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: Take action accordingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.