पाण्यासाठी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
By Admin | Updated: May 23, 2016 23:50 IST2016-05-23T23:40:54+5:302016-05-23T23:50:06+5:30
अहमदपूर : अहमदपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
अहमदपूर : अहमदपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ नियोजनाअभावी शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालिका प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ सोमवारी साजीदभाई मित्र मंडळाच्या वतीने नगर परिषदेवर घागर मोर्चा काढून माठ फोडो आंदोलन केले. त्याचबरोबर पालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली.
दुष्काळामुळे लातूर जिल्हा होरपळून निघत आहे. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र पालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला ३० ते ३२ दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. त्यामुळे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शहरातील साजीदभाई मित्र मंडळाच्या कार्यालयापासून या आंदोलनास सुरुवात झाली.
आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, जुने बसस्थानक मार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकला. या मोर्चावेळी प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली होती. पालिका मैदानात आंदोलन करण्यात आले.
यावेळी साजिद सय्यद म्हणाले, जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाई असताना अहमदपूर शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात पुरेसे पाणी आहे. पण नगर परिषद आणि नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे शहरवासीयांना टंचाईस सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने ही पाणीटंचाई दूर करून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. (वार्ताहर)