जिल्ह्यातील रोहित्रांना आता आॅईलचे ग्रहण
By Admin | Updated: November 16, 2014 00:35 IST2014-11-16T00:18:53+5:302014-11-16T00:35:53+5:30
गजेंद्र देशमुख , जालना महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे.

जिल्ह्यातील रोहित्रांना आता आॅईलचे ग्रहण
गजेंद्र देशमुख , जालना
महावितरणकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार कायम सुरुच आहेत. आता महावितरणकडे आॅईल नसल्याचे कारण देत रोहित्रांची दुरुस्ती थांबविली आहे. महावितरणच्या विभाग एक व दोन मध्ये २५० पेक्षा जास्त रोहित्रे दुरुस्तीसाठी आहेत. दरम्यान, रत्नागिरी येथून आॅईल मागविल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत रोहित्र देणे बंधनकारक असतांनाही कधी तंत्रज्ञ तर कधी आॅईलचे करणामुळे रोहित्र मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दोन्ही विभागात ६३ व १०० केव्हीएच्या रोहित्रांची दुरुस्ती केली जाते. कैन्हयानगर येथील कार्यशाळेत रोहित्रांची दुरुस्ती तसेच इतर कामे होतात.
या दोन्ही विभागाकडे चार चार तालुके देण्यात आले आहेत. जळालेली रोहित्र दुरूस्तीसाठी पाठविणे व ते शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारी संबंधित विभागाकडे आहे. काही दिवसांपूर्वी लोकमतने रोहित्रांची समस्या प्रकर्षाने मांडून शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली होती. ग्रामीण विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्याचा समावेश आहे. या चारही तालुक्यात ६३ व १०० चे मिळून २५० पेक्षा जास्त रोहित्र केवळ आॅईल अभावी पडून आहेत. रोहित्रांमध्ये आॅईलचे काम महत्वाचे काम आहे. कुलंटचे काम केले जाते. (कॉईल थंड करण्यासाठी आॅईलचे कार्य महत्व पूर्ण असते) उच्च तपमानात रोहित्र सुरक्षित ठेवण्याचे तसेच इन्सुलेशन म्हणून आॅईल वापरतात. महिन्याकाठी शेकडो लिटर आॅईल रोहित्रांसाठी लागते. परंतु काही महिन्यांपासून येथील केंद्रात आॅईलचा ठणठणाट आहे.
शुल्क भरुनही रोहित्र मिळेना
विभाग एक व दोन अंतर्गत २५० पेक्षा जास्त रोहित्रे केवळ आॅईलअभावी अनेक दिवसांपासून दुरुस्तीसाठी रखडली आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी महावितरणकडे दुरुस्ती शुल्क भरल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले. १०० केव्हीच्या रोहित्राला ३० हजार तर ६३ केव्हीचे रोहित्रासाठी २० हजार रुपये आकारले जातात. एवढी रक्कम भरुनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.
जिल्ह्यातील जळालेल्या या अडीचशे रोहित्रावरील सुमारे सात हजार शेतकऱ्यांचे कृषीपंप विजे अभावी बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न आहे. त्यातच अनेक गावात योग्य दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने पंप सोबतच रोहित्रेही खाक होत आहेत. खरीप पिकांना पाणी न मिळाल्याने पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. रबीचे पीक तरी हाती लागावे म्हणून शेतकरी वाटेल ते करीत आहेत. महावितरणच्या तारीख पे तारीखमुळे शेतकरी वैतागला आहेत. काही रोहित्रांची तांत्रिक पद्धतीने दुरुस्ती होत नसल्योन ते बसविताच काही तासात पुन्हा जळते. परत दुुरस्तीसाठी पाठविण्यासाठी मोठा वेळ खर्ची करावा लागतो.