बांधकाम विभागातील ३ अभियंत्यांचे निलंबन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:43 IST2017-10-07T00:43:56+5:302017-10-07T00:43:56+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील औरंगाबाद-जालना मंडळातील दोन व जळगाव येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीनंतर बांधकाम खात्याने जारी केले आहेत.

बांधकाम विभागातील ३ अभियंत्यांचे निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील औरंगाबाद-जालना मंडळातील दोन व जळगाव येथे कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या निलंबनाचे आदेश लोकायुक्तांनी केलेल्या चौकशीनंतर बांधकाम खात्याने जारी केले आहेत.
जालन्यातील एका कामात २५ लाख रुपयांचे बिल दोनदा मंजूर करण्यात आले. २५ लाख रुपयांची रक्कम तत्कालीन सांप्रत विभागाचे कार्यकारी अभियंता जी.एच. राजपूत, उपअभियंता एस.के. ताजी, कनिष्ठ अभियंता डी.ए. गायकवाड यांनी दुसºयांदा मंजूर करून गैरव्यवहार केला.
जून २०१६ मध्ये ‘लोकमत’ने हे प्रकरण प्रकाशात आणल्यानंतर स्थानिक पातळीवर याप्रकरणी वाच्यता झाली. २५ लाख रुपयांची रक्कम तिघांनी बांधकाम खात्याकडे भरणा केली. दरम्यान, लोकायुक्तांकडे याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर चौकशी सुरू झाली. २५ लाख रुपयांची रक्कम जर राजपूत, ताजी, गायकवाड यांनी भरणा केली असेल तर ते दोषी आहेत, असा ठपका लोकायुक्तांनी ठेवला.
सध्या राजपूत हे जळगाव येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. उपअभियंता ताजी हे जालन्यात, गायकवाड हे कन्नड उपविभागात कार्यरत आहेत. या तिन्ही अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. विभागाचे अव्वर सचिव जी.बी. शिंदे यांच्या स्वाक्षरीने निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, निलंबनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात जालन्यातील बिलाच्या अफरातफरीमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान, बांधकाम विभागामध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार वाढल्याची प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. मध्यंतरी वैजापूर, फुलंब्री तालुक्यातील काही कामांमधील गैरव्यवहारात अभियंत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता.