२० लाख नागरिकांना आधार
By Admin | Updated: April 28, 2015 00:30 IST2015-04-28T00:17:24+5:302015-04-28T00:30:12+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील ० ते ५ बालकांना व ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीस सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे़

२० लाख नागरिकांना आधार
लातूर : लातूर जिल्ह्यातील ० ते ५ बालकांना व ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीस सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे़ आजपर्यंत नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम सुरु होते़ यामध्ये २० लाख २६ हजार ४०४ नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण केले असून, ऊर्वरित अंगणवाडीतील बालक तसेच ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांच्याही नोंदणीला प्रारंभ करण्यात आला आहे़
लातूर जिल्ह्यात २४ लाख ५४ हजार १९६ लोकसंख्येपैकी २० लाख २६ हजार ४०४ नागरिकांच्या आधार नोंदणीचे काम आजपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे़ तरी यातील १९ लाख २ हजार ३९ नागरिकांना ओळखीचा पुरावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आधार कार्डचे वाटप करण्यात आले आहे़ लातूर जिल्ह्यात ५० आधार नोंदणी संचच्या माध्यमातून आधार नोंदणीचे काम सुरु आहे़ यामध्ये सतत सेवा देणाऱ्या ११ संच सेतू सुविधा केंद्राचाही समावेश आहे़ या आधार नोंदणीच्या कामाला आणखी गती मिळावी, या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने शाळा व अंगणवाडी स्तरावरही आधार नोंदणीचे काम सुरु केले आहे़ याबाबत दहाही तालुक्यांतील तहसीलदारांना आदेश कार्यान्वित केले असून, सर्व विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, बीएलओ, लाईनमन, मुख्याध्यापक यांना संबंधित योजनेतील लाभार्थ्यांचे आधार क्रमांक व आधार नोंदणी क्रमांक संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ त्यामुळे सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांच्याही आधार नोंदणीला गती देण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)