परळीत ११ महिन्यात १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: December 19, 2015 23:52 IST2015-12-19T23:21:51+5:302015-12-19T23:52:07+5:30
संजय खाकरे , परळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे शेतकरी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

परळीत ११ महिन्यात १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
संजय खाकरे , परळी
तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे शेतकरी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. जानेवारी ते १९ डिसेंबर दरम्यान १९ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
गेल्या तीन वर्षापासून तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. शेतीचे काहीच उत्पन्न झाले नसल्याने अल्पभूधारक शेतकरी त्रस्त झाले आहेत. उदरनिर्वाह भागवावा कसा ? मुलींचे लग्न करावे कसे ? या चिंतेतूनही आता आत्महत्या होऊ लागल्या आहेत. जानेवारी व जुलै या दोन महिन्यात प्रत्येकी ४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये प्रत्येकी २ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. एप्रिल, मे, आॅगस्ट, सप्टेंबर, आक्टोंबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
सातभाईचे कुटुंब उघड्यावर
तडोळी येथील शेतकरी अवधुत रावसाहेब सातभाई यांच्या दोन मुलींचे २९ डिसेंबर रोजी तडोळी गावातच विवाह ठरलेला आहे. लग्नासाठीच्या पैशाच्या विवंचनेतून शुक्रवारी त्यांनी आत्महत्या केली. मुलींच्या लग्नापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
पीक कर्जाचे वाटप करण्यात
आले - ध्रुव कुलकर्णी
हैद्राबाद बँकेचे परळीचे शाखाधिकारी धु्रव कुलकर्णी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप सुरूच आहे. नवे जुने कर्ज प्रक्रिया ही चालू आहे. बँकेच्या दत्तक गावात हैद्राबाद बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना विना विलंब कर्ज देण्यात येत आहे.