साडेतीन हजारपैकी २०० हेक्टरवर ऊस
By Admin | Updated: May 10, 2016 00:02 IST2016-05-10T00:00:09+5:302016-05-10T00:02:45+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी,

साडेतीन हजारपैकी २०० हेक्टरवर ऊस
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास साडेतीन हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र होते़ परंतु, यंदाच्या दुष्काळामुळे हे क्षेत्र अवघ्या २०० हेक्टरवर आले आहे़ परिणामी, ग्रीनबेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्याची स्थिती वाळवंटासारखी झाली आहे़
तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, डोंगरगाव यासारखे मोठे प्रकल्प यंदा कोरडेठाक पडले आहेत़ परिणामी, भूजल पातळी सहा मीटरने खालावली आहे. तालुक्यातील ३४ हजार ५०० हेक्टर्स जमिनीपैकी जवळपास २० हजार हेक्टर्स जमीन काळी कसदार असून, घरणी आणि मांजरासारख्या मोठ्या नद्यांचा प्रत्येकी १२ कि.मी. चा किनारा लाभला आहे. तालुक्याच्या चार बाजूस चार प्रकल्प झाल्याने तालुक्यात सिंचन क्षेत्रास मोठा वाव मिळाला आणि साडेतीन हजार हेक्टर्समध्ये उसाची लागवड झाली होती़ यंदा सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. एकंदर, दुष्काळी परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने साडेतीन हजार हेक्टर्समधील उसाचे क्षेत्र शेतकऱ्यांना नाविलाजाने मोडीत काढावे लागले़(वार्ताहर)
वैरणीसाठी वापर...
सर्वाधिक उस उत्पादक शेतकरी अंगण गुणाले, धोंडिराम कारभारी, विठ्ठल पाटील म्हणाले, पशुधन जगविण्यासाठी उसाचा वैरण म्हणून गेली तीन महिन्यांपासून वापर सुरू आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. आता केवळ २०० हेक्टर्स ऊस शिल्लक राहिला आहे. त्यामुळे ग्रीन बेल्ट नाहिसा झाल्याचे तालुका कृषी अधिकारी डी.बी. सुतार, बिभीषण काळदाते, शिवप्रसाद वलांडे यांनी सांगितले.