ऐसे ब्याही से तो मै कुँवारी भली थी...

By Admin | Updated: February 20, 2015 00:06 IST2015-02-19T23:51:28+5:302015-02-20T00:06:47+5:30

अरूण घोडे , अंबड गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृती दत्त जयंतीच्या तीनदिवसीय संगीत महोत्सवाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात गायक विश्वनाथ दाशरथे यांच्या सुश्राव्य गायनाने झाली.

With such a wedding, I was a virgin ... | ऐसे ब्याही से तो मै कुँवारी भली थी...

ऐसे ब्याही से तो मै कुँवारी भली थी...


अरूण घोडे , अंबड
गायनाचार्य गोविंदराव जळगावकर स्मृती दत्त जयंतीच्या तीनदिवसीय संगीत महोत्सवाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात गायक विश्वनाथ दाशरथे यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. त्यानंतर समारोपाचा औपचारिक कार्यक्रम होऊन पं. शौनक अभिषेकींच्या आग्रा-जयपूर घराणा शैलीत ‘ए री माई पिया’ ही विलंबित, ‘ला दे ला दे सैंया चुनरिया, कुसुमरंग की परि, लागू तो रे गरवा, एकहू ना मानूँगी सास-ननद की’ ही द्रुत गायल्यानंतर तराणा, लागी करेजवा कटार, नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी, अबीर गुलाल... आदी अभंगांच्या फर्माइशीचा देखील त्यांनी आदर केला.
यानंतर गायिका हेमा उपासनी यांनी पं. अण्णासाहेब गुंजकर यांच्या घराणेदार गायकीत राग बिहागने दमदार सुरुवात केली. ‘कैसे सुख सोवे नींदरिया’ या पारंपरिक रचनेनंतर तीन तालात निबद्ध पं. नाथराव नेरळकर विरचित ‘जाने दे जाने दे’ ही द्रुत रचना सादर केली. रसिक सभागृहाच्या विनंतीवरून हिमांशू कुलकर्णी यांची मराठी गझल
‘रात्र ऐसी गोठली की चंद्रही थरकापला’ आणि मंगेश पाडगावकरांची रचना ‘ते दान त्या क्षणाचे, घेता मला न आले’
देखील रसिकांची प्रचंड दाद मिळवून गेली. या दोन्ही सुरावटी पं. नाथराव नेरळकरांच्या होत्या. यानंतर पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य रूपक कुलकर्णी यांचे सुमधुर बासरीवादन झाले. कोणत्याही पारंपरिक अथवा गाजलेल्या बंदिशीची पुनरावृत्ती न करता त्यांनी स्वतंत्र प्रतिभेने अप्रतिम बासरीवादनाचा नमुना सादर केला. आलाप, स्वरविस्तार आणि क्रमिक बढत खुलवत खुलवत त्यांनी एवढी वातावरण निर्मिती केली, की सभागृहाबाहेरील विखुरलेली मंडळी आत येऊन बसली. त्यांनी बागेश्री रागातील संगीत रचना सादर केल्यानंतर वास्तविक त्यांना देण्यात आलेला वेळ संपला होता; पण आलेल्या रंगतीमुळे तो कुणीकडे निघून गेला ते कळलेदेखील नाही. त्यांच्या बासरीवादनाची पेशकश एवढी दमदार होती की, रसिकांनी त्यांना वेळ वाढवून दिला. त्यानंतर त्यांनी दुर्गा राग सादर केला. त्यांच्या बासरीवादनाला मुकेश जाधव यांच्या तबल्याची समर्थ साथ लाभली होती. यानंतर श्री दत्त जयंती संगीत महोत्सवरूपी पंढरीचे स्वत:ला वारकरी मानणारे शिवदास देगलूरकर यांनी ईशस्तवन सादर केले. नंतर लगेचच हंसध्वनी राग सादर करून त्यांनी आपली हजेरी लावली, तेव्हा उत्तर रात्र झाली होती.
भाऊंच्या भैरवीचा मान...
श्रीदत्त जयंती संगीत महोत्सवाच्या ९0 वर्षांच्या परंपरेतला हा अत्यंत भावनिक आणि हृद्य टप्पा. कारण गायनाचार्य गोविंदराव जळगावकरांची ही ‘भैरवी’ची जागा राखीव असायची. शास्त्रीय संगीतापासून अनभिज्ञ असलेली मंडळीदेखील ‘भाऊं’च्या भैरवीसाठी ‘पाहे प्रसादाची वाट’ या श्रद्धेने वाट पाहायचे. तो क्षण पं. नाथराव नेरळकरांच्या गायनाने संपन्न होणार म्हणून आयोजन-संयोजनादी सेवेत सातत्याने धावपळ करणारी सर्व मंडळीदेखील या सांगता समारंभाला येऊन गर्दी करण्याचा हा क्षण. पं. नाथराव नेरळकरांच्या निवडक शिष्यांनी वाद्ये सज्ज केल्यानंतर गुरुजींनी आदरणीय भाऊंच्या बावनकशी षड्जाची आवर्जून आठवण केली. सोबत हेमा उपासनी, शिवदास देगलूरकरांसह नवशिक्या शिष्यांच्या चेहऱ्यावर भाऊंच्या भैरवीचा मान आणि श्रद्धा झळकत होती. हा सर्व ताफा विनम्रतेने विराजमान झाला असा एकंदरीत थाट होता.
तबलावादक सागरने डग्ग्यावर थाप देऊन ‘धिन’ असा गंभीर स्वर काढला. तो इशारा समजून पं. नाथराव नेरळकरांनी मैफलीला अभिवादन करून तंबोऱ्याशी आपला स्वर मिळवला. भरदार गंभीर आवाजाने सर्व सभागृह निनादून टाकले आणि आपल्या तपस्वी स्वराने सर्व श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. उत्तररात्रीची दरबारीची वेळ आणि नाथरावांनी दरबारीचा एक एक स्वर लावायला सुरुवात केली. मंद्र सप्तकातून मध्य सप्तकात स्वर सावकाश लावणे चालू होते. त्या स्वरीकरणात सुरेल ‘मिंड’चा वापर करून ते षड्जाला येऊन मिळत. तेव्हा विलक्षण आल्हाद वाटे.
नाथराव गुरुजी जिथं तो स्वर सोडीत तिथून तो स्वर मागील शिष्य आलटून पालटून आलापीला सुरू करीत. ते एखाद्या स्वरावर येत आहेत तो स्वर पकडून गुरुजी आलाप करायला सुरुवात करीत आणि नवीन स्वर दाखल करून पुन्हा स्वरावर येऊन सागरकडून समेची ‘धिन’ घेत. गुरु-शिष्यांची ही एकमेकांना होत असलेली विविध रचनात्मक अनुकूल साथ ऐकून आपण आज मैफलीत गायनाचा नवीनच प्रकार ऐकत आहोत, असे क्षणभर मनाला चाटून जात होते.
‘नैन सो नैन मिलाओ रसिया’
या शब्दांसहित रागवाचक स्वर घेऊन दरबारी रागातल्या सौंदर्य स्थळावर नाथराव गुरुजींनी मुक्काम ठोकला. तेव्हा मैफलीतल्या रसिक बलमांनी ‘वाहवा’, ‘अहाहा’ असे उत्स्फूर्त उद्गार काढले. एवढा सच्चा स्वर गुरुजींनी लावला आणि रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
गोविंदराव जळगावकरांची आठवण होऊन डोळ्यातून आनंदाश्रू आले. कारण हा स्वर ‘भाऊंच्या’ गळ्यातूनही असाच निघत असे. पुन: पुन: मंद्र सप्तकात उतरून रागाच्या सौंदर्यस्थळावर येऊन नाथराव गुरुजी थांबायचे, तेव्हा तोच स्वर नवनवे अलंकार लेऊन नटून थटून उभा राहतोय असं वाटायचं. या दरबारीची छाया सबंध मैफलीवर पसरली. तेव्हा आता भैरवीकडे न वळता असाच दरबारी ऐकत राहावा, असे वाटू लागले; पण नाइलाज...
संत कबिराची मुलगी कमालीची गाजलेली भक्तिरचना गुरुजींनी भैरवीसाठी घेतली.
‘सैंया निकस गए, मैं ना लडी थी
ना कछू बोली ना कछू चाली
सर को झुकाए मै तो चुपके खडी थी
मेरी गर ना माने तो सहेली से पूछो
चादर ओढ के पलंगा पढी थी
रंगमहल के दस दरवाजे
न जाने कौन सी खिडकी खुली थी
कहत कमाली कबीरा की बेटी
ऐसे ब्याही से तो मै कुँवारी भली थी
या भैरवीने समस्त रसिक आनंदचिंब झाले आणि हा दत्त जयंती संगीत महोत्सव पुन्हा कधी येईल, अशी हुरहुर मनात घेऊन जड पावलांनी घरी परतले.

Web Title: With such a wedding, I was a virgin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.