विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय
By Admin | Updated: December 15, 2014 00:47 IST2014-12-15T00:17:19+5:302014-12-15T00:47:09+5:30
कडा : लहान मुलांचे अपहरण हे आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात ऐकावयास मिळत असे. पण शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय झाली आहे.

विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय
कडा : लहान मुलांचे अपहरण हे आतापर्यंत केवळ ग्रामीण भागात ऐकावयास मिळत असे. पण शाळकरी विद्यार्थ्यांना पळविणारी टोळी आष्टी तालुक्यात सक्रिय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता पोलीस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
आष्टी तालुक्यातील खिळद जिल्हा परिषद शाळेत दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलांना चॉकलेट, बिस्कीट व पैशाचे आमिष दाखवत चारचाकी, दुचाकी वाहनाजवळ बोलावून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या घटनेला धडाडीने सामोरे जात आपली सुटका करुन घेतली. उलटअर्थी टोळीच्या हातावर तुरी देऊन मोठ्या शिताफीने आपली सुटका करुन घेतली. या प्रकारामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलांसह पालकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शाळेत मुलांना पाठविताना पालकांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. मुलांना शाळेत पाठवावे की नाही? याबाबत पालकांत धास्ती बसली असल्याचे येथील एका पालकाचे म्हणणे आहे.
असाच काहीसा प्रकार खिळद येथील जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी घडला. शाळेच्या मधल्या सुट्टीत अशाच एका टोळीने शाळा परिसरात येऊन विद्यार्थ्यांना आमिष दाखवत जवळ बोलावले. गोडगोड बोलत चॉकलेट, बिस्कीट, पैशाचे आमिष दाखवत काहीतरी बतावणी करुन वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी या टोळीकडून आपल्याला फसवले जात असल्याचा संशय येताच विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताला चावा घेऊन आपला सुटका करुन घेतली.
या घटनेची गांभीर्याने दखल न घेता अद्यापपर्यंत पोलिसांकडून या प्रकरणाची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. खिळद येथील शाळेत घडलेल्या प्रकारामुळे मुख्याध्यापक बाबासाहेब पवार यांनी अंभोरा पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तालुक्यात अनेक शेतमजूर ऊसतोडणीसाठी बाहेरील जिल्ह्यात व परराज्यात गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही त्यांच्या आजी-आजोबावर टाकली आहे. यातच मुलांना पळवून नेण्याचे गंभीर प्रकार सुरु असल्याने पालकवर्गातून मुलांविषयी अधिकच काळजी वाटू लागली आहे.
काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी शांत न राहता या प्रकाराची गंभीर दखल घेऊन शाळा परिसरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे पालक वर्गातून बोलले जात आहे. मात्र या घटनेचे कोणतेही गांभीर्य अंभोरा पोलीस ठाण्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र सध्यातरी या भागातील शाळा परिसरात दिसून येत आहे.
या संदर्भात अंभोरा ठाण्याचे सपोनि शिवाजी गुरमे म्हणाले, या टोळीचा छडा लावण्यासाठी जागोजागी खबऱ्यांना माहिती दिली आहे. तर विद्यार्थ्यांनीही अनोळखी माणसापासून दूर राहून त्याच्या आमिषाला बळी पडू नये. असे काही आढळल्यास शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)