अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची ‘सत्वपरीक्षा’च
By Admin | Updated: January 11, 2015 00:56 IST2015-01-11T00:47:03+5:302015-01-11T00:56:36+5:30
सोमनाथ खताळ , बीड परीक्षा.. परीक्षा हा शब्द कानावर पडताच घाम फुटायला लागतो.

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची ‘सत्वपरीक्षा’च
सोमनाथ खताळ , बीड
परीक्षा.. परीक्षा हा शब्द कानावर पडताच घाम फुटायला लागतो. मी मी म्हणणाऱ्यांच्या पायाखालीच वाळू सरकते, मात्र काही विद्यार्थी असे आहेत की त्यांनी अभ्यासासोबत एकप्रकारे मैत्रीच केली आहे. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बीड शहरात मोठ्या प्रमाणात आहे. ७० टक्के विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झाला असून १० टक्के विद्यार्थ्यांचा थोडा बाकी आहे. २० टक्के महानगांना तर परीक्षेचे गांभीर्यच नसून त्यांची परीक्षेची कसलीच तयारी झालेली नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा नसून एकप्रकारे सत्वपरीक्षाच आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहिर झाल्या असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेला सुरूवात होत आहेत. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या तयारीबद्दल लोकमतने विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्वेक्षण केले. अभ्यासाला पुरक असणाऱ्या १० प्रश्नांची प्रश्नावली १०० विद्यार्थ्यांकडून भरून घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाची गती वाढविल्याचे दिसून आले. मुलांपेक्षा मुलींनी रात्रीच्यावेळी अभ्यास करण्याला अधिक पसंती दिली आहे. सकाळी घरगूती काम आणि अभ्यासाठी पुरक असे वातावरण नसल्यामुळे सकाळच्या वेळी अभ्यासात मन लागत नसल्याचे क्रांती जोगदंड, नेहा काकडे, दामिनी तांगडे, वैष्णवी राऊत या विद्यार्थीनींनी सांगितले. रात्री तर अभ्यास करतोतच शिवाय सकाळी चार वाजता शांत वातावणातही आम्ही अभ्यास करीत असल्याचे सुकन्या राऊतमारे, आरती बाहेती, अंकीता सवाई, रेवती गिरी, अर्चना मस्के यांनी सांगितले.
मुलींनी तर अभ्यासाची गती वाढविलीच आहे, शिवाय मुलेही मागे नसल्याचे दिसून येत आहे. रात्री घराबाहेर जास्तवेळ थांबले तरी सकाळी उठून जास्त अभ्यास करण्याला मुलांना पसंती दिली आहे. सकाळच्यावेळी चार ते आठ या वेळेत आम्ही अभ्यास करीत असल्याचे संकेत तांगडे, आेंंकार मिरगे, अभिजीत कुलकर्णी, शेख अफ्रिदी या विद्यार्थ्यांनी सांगितले.
दोन तास अधिक अभ्यास
पुर्वी विद्यार्थी तीन किंवा चार तास अभ्यास करीत होते. आता यामध्ये वाढ केली असून रात्री व पहाटे एक तास जादा अभ्यास विद्यार्थी करू लागले आहेत. इतर ठिकाणी व्यर्थ वेळ घालविण्यापेक्षा अभ्यास करण्यास विद्यार्थी पसंती देत असल्याचा विश्वास स्वा.सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य उद्धव नागरगोजे यांनी सांगितले.
नियोजन करा - प्राचार्य सानप
परीक्षा जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे अभ्यासासाठी मोजकाच कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे. तसेच आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे सल्ला बलभीमचे प्राचार्य डॉ. वसंत सानप व वसंतराव काळे पत्रकारीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांनी दिला आहे.
परीक्षा जवळ आल्या असल्याने अनेक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून परीक्षेचा सराव करून घेतला जात आहे. परीक्षेत अडीअडचणी येवू नयेत यासाठी आम्ही हा मार्ग अवलंबला असल्याचे सावरकर महाविद्यालयातील प्रा.चंद्रकांत मुळे, प्रा.बाळासाहेबउ साळवे, प्रा.पसारकर, प्रा.मुकूंद देशमुख यांनी सांगितले. ३० टक्के विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अभ्यास करून घेतला जात नाही तर तेवढ्याच विद्यार्थ्यांनी कधीतरी अभ्यास करून घेतल्याचे सांगितले. ४० टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यास करून घेतला जात असल्याचे सांगितले.
आजही अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास बाकी आहे. पहाटे अभ्यास करणाऱ्या मुलांची टक्केवारी ६० आहे तर मुलींची २० आहे. रात्रीच्यावेळी ७५ टक्के मुली अभ्यास करतात तर ३० मुले करतात. २० टक्के मुलांनी व ५ टक्के मुलींनी अभ्यासाकडे पाठ फिरविली आहे. सकाळच्यावेळी मुलींना अधिक काम असल्यामुळे त्या रात्री अभ्यास करतात तर रात्रीच्याला मुले जास्तवेळे बाहेर थांबतात, त्यामुळे पहाटे उठून मुले अभ्यास करीत असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले. ३० टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यासाठी इंटरनेटचा वापर केला आहे.