वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’

By Admin | Updated: November 17, 2015 00:34 IST2015-11-17T00:22:13+5:302015-11-17T00:34:46+5:30

औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या

Stuck in the vicious struggle | वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’

वशिलेबाजीत अडकले ‘बीजभांडवल’


औरंगाबाद : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या सुधारित बीजभांडवल योजनेच्या लाभार्थी निवडीच्या याद्या अखेर सोमवारी (दि.१६) जाहीर करण्यात आल्या. लाभार्थ्यांची निवड करताना आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप बेरोजगारांनी केला आहे. पुढाऱ्यांच्या शिफारशींना लाभार्थी निवडीत झुकते माप दिल्याचा आरोपही काही जणांनी केला. यादीत आपले नाव नसल्याचे बघून काहींना रडू आवरणे कठीण झाले होते.
बीजभांडवल योजनेंतर्गत स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी बेरोजगारांना २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य कर्जाच्या रुपात मिळवून दिले जाते. निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी बँकांना सादर केली जाते. या योजनेसाठी खुल्या प्रवर्गातील ६७, तर मागास प्रवर्गातील १६७ लाभार्थ्यांची निवड करण्याचे उद्दिष्ट उद्योग केंद्राला देण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील १,५२५, तर मागास प्रवर्गातील १,३१३ जणांनी अर्ज केले होते. आपल्याच मर्जीतील लाभार्थ्यांची निवड करावी, यासाठी मंत्री, खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या होत्या. लाभार्थी निवडीसाठी मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अखेर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली.
अपेक्षाभंग झाला
बीजभांडवल योजनेसाठी मी गेल्या चार वर्षांपासून अर्ज करीत आहे. मसाले, चिप्सच्या घरगुती उद्योगाच्या विस्तारासाठी यंदा अर्ज केला होता. मुलाखतही चांगली झाली होती. मुलाखतकर्त्यांनी तयार करण्यास सांगितलेले पदार्थ मी तातडीने केले होते. ‘तुमची निवड होईल,’ असा विश्वासही त्यांनी दिला होता; परंतु यादीत नाव नसल्याने अपेक्षाभंग झाला आहे. उद्योगासाठी कर्ज घेण्यास गेल्यास बँका तारण मागतात. तारण ठेवण्यासारखे काही नसल्याने बीजभांडवल योजनेसाठी अर्ज केला होता. गुणवत्तेच्या आधारावर निवडीची खात्री होती; परंतु यादीवर नजर टाकल्यानंतर लाभार्थी निवडीत नक्कीच घोटाळा झाल्याचे वाटते, असे मंजूषा कुलकर्णी यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांवर सरबत्ती
यादी बघून संतप्त झालेल्या काही बेरोजगारांनी उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांची भेट घेतली. आपली निवड न झाल्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करून त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. बेरोजगारांची समजूत घालण्याचा जोशी यांनी प्रयत्न केला.
पारदर्शी निवड
बीजभांडवल योजनेसाठी उद्दिष्टाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते.
लाभार्थ्यांची निवड अत्यंत पारदर्शकपणे केली. राजकीय दबाव व आर्थिक कारणांमुळे निवड झाल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नसल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक जी. बी. जोशी यांनी सांगितले.

Web Title: Stuck in the vicious struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.