वाळूज महानगर: पथदिवे बंद असल्याने बजाजनगरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही एमआयडीसी दिवे लावत नाही. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
येथील गणपती मंदिर ते गोरख वाघ चौक, आम्रपाली बुद्ध विहार ते जयभवानी चौक, हायटेक विद्यालय ते आम्रपाली बुद्ध विहार, महाराणा प्रताप चौक ते गणपती मंदिर, रामलीला मैदान, मोरे चौक ते मोहटादेवी मंदिर, इंद्रप्रस्थ, चिंचबन कॉलनी या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.
अनेकवेळा अर्ज, विनंत्या करुनही एमआयडीसीकडून पथदिवे सुरु केले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे महिला-तरुणींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.