अजूनही सोसाव्या लागतात आगीच्या झळा

By Admin | Updated: June 20, 2014 00:44 IST2014-06-19T23:37:50+5:302014-06-20T00:44:07+5:30

अंंबाजोगाई: अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला तीन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाला होता.

Still have to burn fire | अजूनही सोसाव्या लागतात आगीच्या झळा

अजूनही सोसाव्या लागतात आगीच्या झळा

अंंबाजोगाई: अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला तीन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाला होता. या आगीच्या मोठ्या झळा आजही विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना तहसील कार्यालयातून विविध कागदपत्रे काढताना सहन कराव्या लागत आहेत. या समस्येमुळे विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करताना मोठी दमछाक होत आहे.
शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना आपल्या कामकाजासाठी तहसील कार्यालयातून विविध प्रमाणपत्रांची गरज ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र ही कागदपत्रे मिळविताना मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. २७ एप्रिल २०११ रोजी अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेखा कक्षाला लागलेल्या आगीत ७० वर्षांपासूनचे जुने रेकॉर्ड व महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जळून खाक झाला. यात प्रामुख्याने भूमिअभिलेखाचे पुरावे इनामी देवस्थान जमिनीच्या महत्त्वपूर्ण नोंदी, निझामकालीन दस्ताऐवज, जात पडताळणीसाठी लागणारे विविध महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली.
महत्त्वपूर्ण कागदपत्रांच्या मूळ प्रतीच नसल्याने आता पुढील कागदपत्रे व प्रमाणपत्रे देताना आधार कशाचा घ्यायचा हा मोठा प्रश्न महसूल प्रशासनासमोर पडतो. परिणामी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे घेताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तोंडावर आलेल्या तारखा, जात प्रमाणपत्र सादर करण्याची आलेली वेळ, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण होतो. यामुळे विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. वेळेवर कागदपत्रे न मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
क्षेत्र निश्चितीसाठी मोठ्या अडचणी
मूळ दस्तऐवज जळून खाक झाल्याने आता जमिनीचे एकत्रीकरण क्षेत्र निश्चिती, तुकडे बिल, वाटण्या करतांना मूळ कागदपत्रांचा आधारच मिळत नसल्याने क्षेत्र निश्चिती करण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयासमोरही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
मुडेगाव येथील शेतकरी पांडुरंग हरिभाऊ भोसले म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून माझ्या शेतजमिनीच्या एकत्रीकरणाची नक्कल मिळवण्यासाठी मी भूमिअभिलेख कार्यालयात दररोज चकरा मारतो. माहिती अधिकार अशा विविध माध्यमातून कागदपत्रांची मागणी केली.
मात्र, मूळ दस्तऐवज जळाल्याने ही कागदपत्रे देता येत नाहीत. असे प्रशासकीय उत्तर मिळत असल्याने शेतीच्या नोंदी मिळवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे पांडुरंग भोसले लोकमतशी बोलताना म्हणाले.
सर्वांच्या पुढाकारानेच समस्या दूर होईल - माजी मंत्री पंडितराव दौंड
मूळ दस्ताऐवज मिळविण्यासाठी न्यायालय, भूमिअभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्त कार्यालय अशा विविध विभागात दावे व विविध प्रकरणे दाखल झालेली आहेत.
जी जुनी प्रकरणे दाखल झाली आहेत. त्या प्रकरणांमध्ये अशा दस्तऐवजाच्या सत्यप्रती उपलब्ध असतात. त्या प्रती हस्तगत करून सर्वांच्या पुढाकाराने व सामाजिक दायित्वातून सर्वांनी पुढाकार घेतला तरच पुन्हा हे दस्तऐवज मिळविणे शक्य होईल, मूळ दस्तऐवजाच्या सत्यप्रती प्रशासनाला उपलब्ध झाल्यास या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री अ‍ॅड. पंडितराव दौंड यांनी व्यक्त केली.
‘मूळ कागदपत्रे न राहिल्याने अडचणी’
अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेखा कक्षाला लागलेल्या आगीमुळे आजही जुने सातबारा, फेरफार व जातीचे प्रमाणपत्रे देताना महसूल प्रशासनासमोर मोठ्या अडचणी येतात. मूळ कागदपत्रेच न राहिल्याने या अडचणींमुळे हे अडथळे निर्माण होत असल्याचे तहसीलदार राहुल पाटील म्हणाले.

Web Title: Still have to burn fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.