राज्य सरकारही उद्योगपतींचे : जयंत पाटील

By Admin | Updated: September 15, 2015 00:23 IST2015-09-14T23:45:26+5:302015-09-15T00:23:24+5:30

लातूर : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी लातूर जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले़

State Governments: Industrialists: Jayant Patil | राज्य सरकारही उद्योगपतींचे : जयंत पाटील

राज्य सरकारही उद्योगपतींचे : जयंत पाटील


लातूर : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी लातूर जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले़ बैलगाड्यांसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते़ लातूर शहरात राजीव गांधी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ अहमदपूर व चाकूर येथे झालेल्या आंदोलनात माजी मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारही उद्योगपतींचे धार्जिणे असल्याचा आरोप केला.
निलंगा, रेणापूर, औसा, जळकोट, चाकूर, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर आणि लातूर तालुक्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले़ कर्जवसूली स्थगित करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या दावणीला चारा देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या टँकरची संख्या वाढवावी, रोजगार हमी योजनेत मागेल त्याला काम देण्यात यावे, दुधासाठी किमान २५ रुपये लिटर खरेदी भाव देण्यात यावा, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, फळबागाची नुकसान भरपाई, रेशन दुकानावर गहु, तांदळाबरोबर तेल व दाळी देण्यात याव्यात, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली़ लातूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शहरातील राजीव गांधी चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला़ तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली़ आंदोलनात रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष आ़ निरंजन डावखरे, आ़विक्रम काळे, प्रदीप गरडकर, मकरंद सावे, अशोक गोविंदपूरकर, आशाताई भिसे, संजय शेटे, नवनाथ अल्टे, मुर्तुजा खान, शैलेश स्वामी, राजा मणियार, राजेंद्र इंद्राळे, राहूल माकणीकर, स्रेहलता अग्रवाल, रेहाना बासले आदी सहभागी झाले होते.
उदगीर : दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी उदगीरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले़ तत्पूर्वी मुख्य रस्त्यावरुन गाढवांसह मोर्चा काढण्यात आला़
उदगीर तालुक्याच्या मोर्चाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे यांनी केले़ शहराच्या मुख्य रस्त्यावरुन बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला़ यावेळी मोर्चामध्ये गाढवांनाही सहभागी करण्यात आले होते़ सरकारचा निषेध करणारी अन् मागण्या करणारे फलक कार्यकर्त्यांच्या हाती झळकत होते़ यावेळी आंदोलकांना संबोधित करताना संजय बनसोडे यांनी शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले़ तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदार भालेराव हे दुष्काळग्रस्तांसाठी काहीही प्रयत्न करीत नसल्याचा आरोप केला़ त्यांच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी, सामान्य नागरिक दुष्काळात आणखी भरडला जात असल्याचाही आरोप बनसोडे यांनी केला़
यावेळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, माजी सभापती मधुकर एकुर्केकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला वाडकर, सेवादलाचे नवनाथ गायकवाड, नथुराम जाधव, अजित पाटील, बालाजी कांबळे, अजहर शेख, विष्णुकांत राजगौंड, चंदन पाटील नागराळकर, साबेर पटेल, डॉ़संपत वाघमारे, नवज्योत शिंदे, शक्ती बलांडे, पंकज कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते़
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर देवणी तालुक्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ निलंगा चौकात बसवराज पाटील नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जनावरांसह आंदोलन केले़ त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती़ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन नंतर त्यांची सुटका केली़ या आंदोलनात सूर्यशीला मोरे, शिवाजीराव शेंडगे, महेश जाधव, डॉ़इद्रिस भातांब्रे, प्रा़अनिल इंगोले, अनिल कांबळे, अ‍ॅड़भरत पाटील, हकीम बौडीवाले, अंकुश गायकवाड, रविशंकर बिरादार, आदित्य पाटील, सोमनाथ रावळे, दादा कुरेशी, राजकुमार साबणे, कविता कारभारी, हसन मोमीन, संतोष बिरादार, सचिन घाळे, नागनाथ बिरादार, संतोष बोचरे, सिद्धू पाटील सहभागी होते़
केंद्र व राज्यातील भाजपा-सेना युतीचे शासन हे शेतकऱ्यांचे नाही़ उद्यागपतींच्या पाठीमागे युतीचे शासन खंबीरपणे उभे आहे़ शेतकऱ्यांना मात्र या शासनाने वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप माजी मंत्री आ़जयंत पाटील यांनी येथे केला़ अहमदपूर व चाकूर येथे त्यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन झाले़ यावेळी ते बोलत होते़ मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे़ शासन मात्र बेफिकीर असून, चाऱ्या-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ छावण्या नाहीत, मजुरांच्या हाताला काम नाही, अशा स्थितीत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे परदेश दौरे सुरु आहेत़ निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केली आहे़ ज्यांच्या जिवावर सत्ता मिळविली, त्या शेतकऱ्यांनाच आता या सरकारने वाऱ्यावर सोडले असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले़ १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ मराठवाड्यात पडला आहे़ कर्ज काढून शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली़ मात्र निसर्गाने दगा दिल्यामुळे पिके गेली़ शासनही साथ देत नाही़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांसाठी जेलभरो आंदोलन केले असल्याचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यावेळी म्हणाले़
आंदोलनात माजी राज्य मंत्री बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, नगराध्यक्ष शिवराजअप्पा चौधरी, शंकरराव जाधव, बाळासाहेब पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल, सिराज जहागिरदार, मिनाक्षी शिंगडे, शाहुबाई कांबळे, विनायक पाटील, विजय पवार आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला़

Web Title: State Governments: Industrialists: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.