आजपासून मैदानी चाचणीस प्रारंभ
By Admin | Updated: June 15, 2014 00:33 IST2014-06-15T00:21:52+5:302014-06-15T00:33:11+5:30
परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली

आजपासून मैदानी चाचणीस प्रारंभ
परभणी : जिल्हा पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू झाली असून, या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून प्रारंभ होत आहे़ मैदानी चाचणीसाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून, ही चाचणी ९ ते १० दिवस चालेल़
परभणी जिल्हा पोलिस दलात १४८ पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे़ ६ जूनपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली़ सुमारे ६ हजार ५०० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी ६ ते १२ जून या काळात करण्यात आली़ कागदपत्र तपासणीमधून ३ हजार ९७२ उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत़
दररोज १ हजार उमेदवारांची कागदपत्र तपासणी करण्यात आली़ जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही तपासणी पार पडली़ रविवारपासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे़ यात पहिल्या सत्रात धावण्याची चाचणी होईल़ त्यानंतर दुपारच्या सत्रात लांब उडी, पूल अप्स्, गोळाफेक अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत़ दररोज ५०० उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडेल़
पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे़ भरती प्रक्रियेसाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलिस अधिकारी काळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक डॉ़ विवेक मुगळीकर, राखीव पोलिस निरीक्षक राठोड, इनामदार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व परिविक्षाधिन अधिकारी भरती प्रक्रियेमध्ये नियुक्त केले आहेत़ कागदपत्र तपासणीनंतर दुसऱ्या टप्प्यासाठी ३ हजार ९७२ उमेदवार पात्र ठरले आहेत़ त्यात ३ हजार ५५० उमेदवार खुल्या गटातील आहेत़ तसेच ३९५ महिला उमेदवार आणि २७ माजी सैनिक उमेदवारांचा यात समावेश आहे़
पुरुष उमेदवारांसाठी पाच किमी धावण्याची चाचणी होणार आहे़ ही चाचणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात सकाळच्या वेळेत घेतली जाईल़ त्यानंतर दुपारी लांब उडी, पुल अप्स्, गोळाफेक, शंभर मीटर धावणे अशा स्पर्धा होणार आहेत़
दररोज ५०० उमेदवारांची चाचणी होईल़ पोलिस प्रशासनाच्या वतीने उमेदवारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच भरतीच्या स्थळी पुरेसा निवाराही उभारला आहे़ ९ ते १० दिवस मैदानी चाचणी होणार असून, त्यानंतर भरती प्रक्रियेतील शेवटचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे़ (प्रतिनिधी)
धावण्याची चाचणी सकाळीच
पोलिस भरती प्रक्रियेत पुरुष उमेदवारांसाठी धावण्याची चाचणी ही सर्वात अवघड असते़ पाच किमी धावण्याची चाचणी घेतली जाते़ दुपारी वाढलेल्या उन्हाचा परिणाम उमेदवारांवर होऊ नये, यामुळे उन्हापूर्वी सकाळच्या वेळेतच ही चाचणी घेतली जाणार आहे़ विशेष म्हणजे, ज्या उमेदवारांची धावण्याची चाचणी झाली आहे़ त्यांच्या इतर मैदानी चाचण्या दुसऱ्या दिवशी होतील़
भरती प्रक्रियेसाठी पोलिस प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे़ उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून भरती स्थळी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे़
दहा दिवसांचा कालावधी
या भरती प्रक्रियेतील कागदपत्र तपासणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, दुसरा टप्पा मैदानी चाचणीचा आहे़ साधारणत: दहा दिवस ही चाचणी चालेल़
भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जाणार असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, भरतीदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास उमेदवारांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़