जाळीचा देव यात्रोत्सवास प्रारंभ; आज निघणार रथयात्रा
By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:26:43+5:302015-02-03T00:57:36+5:30
फैजुल्ला पठाण/बाळू मोकासरे ,जाळीचा देव महानुभव पंथाचे संस्थापक गुरु श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या जाळीचा देव हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून

जाळीचा देव यात्रोत्सवास प्रारंभ; आज निघणार रथयात्रा
फैजुल्ला पठाण/बाळू मोकासरे
,जाळीचा देव
महानुभव पंथाचे संस्थापक गुरु श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेल्या जाळीचा देव हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी मंगळवारी माघ पौर्णिमेला पालखी रथ यात्रा निघणार आहे. या पूर्वसंध्येलाच परिसर गजबजून गेला असून मोठी यात्रा भरली आहे.
या यात्रेनिमित्त प्रशासनानेही तयारी केली आहे. पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात १२ पोलिस अधिकारी, २५ कर्मचारी, १० महिला पोलिस यांचा समावेश आहे. पारध पोलिस ठाण्याअंतर्गत कर्मचारी व अतिरिक्त पोलिस बंदोबस्त जालना येथून मागविण्यात आला असल्याची माहिती पारध ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिली.
यात्रेनिमित्त एस.टी. महामंडळाच्या वतीने बुलढाणा, सिल्लोड, जालना, जळगाव, सोयगाव, जाफराबाद या आगारांमधून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिसरात चार मोठे आश्रम आहेत. यात अंबेकर बाबा, लोणारकर बाबा, लासूरकर बाबा आणि मेहकर बाबा यांचे आश्रम आहेत. सुमारे २०० ते २५० साधक एकाचवेळी ध्यानधारणेस बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानतर्फे दररोज अन्नदान सुरू आहे. नगर व पुणे जिल्ह्यातील काही भाविकांनी श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या वतीने मोफत अन्नदान सुरू केले आहे.
यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी आठ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिरात पुजेचा मान प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पुजाऱ्यांकडे असतो. महानुभाव पंथीय म्हणून या गावाची विशेष ओळख आहे. पुणे, नाशिक, मेहकर, भडगाव, पाचोरा तसेच विदर्भ व खांदेशातून विविध ठिकाणांहून भाविकांच्या दिंड्या या ठिकाणी दाखल होत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीनेही आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची माहिती सरपंच सुमनबाई उदभरे व ग्रामसेवक एन.पी. सोळंके यांनी सांगितले. यात्रेनिमित्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार वाहनांची दर यात्रेला येथे ये-जा होते, असे पार्किंगचालक संजू वार्इंदेशकर यांनी सांगितले.