३० टक्केच पेरण्या
By Admin | Updated: July 16, 2014 00:48 IST2014-07-16T00:41:22+5:302014-07-16T00:48:44+5:30
नांदेड : मृगनक्षत्र सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला असतांना जिल्ह्यात १० जुलैअखेर १७ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

३० टक्केच पेरण्या
नांदेड : मृगनक्षत्र सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला असतांना जिल्ह्यात १० जुलैअखेर १७ टक्के पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. गतवषीर्ची तुलना केली असता १२ जुलैअखेर १०५ टक्के पेरणी पूर्ण होऊन पीके डोलू लागली होती.
यंदा बळीराजाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्यामुळे जुलैचा अर्धा महिना संपला तरी आजपर्यंत पेरणीलाच प्रारंभ झाला नव्हता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून बरसत असलेल्या पावसामुळे विविध भागात पेरणीला वेग आला असल्याचे चित्र आहे. शनिवारी, रविवारी झालेल्या पावसानंतरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे, परंतु यापेक्षा दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार १७ टक्के पेरणी झाली असली तरी प्रत्यक्षात मात्र ३० ते ३५ टक्के ऐवढी पेरणी झाल्याचा अंदाज आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ७ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून १० जुलैपर्यंत १ लाख २६१०० हेक्टरवर म्हणजे १७.४७ टक्के पेरणी झाली. यात कापूस ९१५०० हेक्टर, सोयाबीन २०३०० हेक्टर व अन्य तूर, उडिद व मूग , ज्वारी या पिकांचा समावेश आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभीच खत-बियाणांची खरेदी करुन ठेवली होती, परंतु पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या.
गतवर्षी २०१३-१४ च्या खरीप हंगामात ७ लाख २१ हजार ८०० हेक्टर प्रास्तावित क्षेत्रापैकी १२ जुलैअखेर जिल्ह्यात १०५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. यात ज्वार ८३ हजार ५०० हेक्टर, तूर ५४ हजार ८०० हजार हेक्टर, मूग २८ हजार हेक्टर, उडीद २९ हजार ९०० हेक्टर, सोयाबीन २ लाख ५९ हजार ६०० हेक्टर, गळीत धान्य १९४०० हेक्टर, कापूस २ लाख ७४ हजार ७०० हेक्टर याप्रमाणे एकूण खरीप पिकांची ७ लाख ४१ हजार ६०० हेक्टरवर पेरणी झाली होती. परंतु यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाला नसल्याने अद्यापही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
२०१४ च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची ३ लाख हेक्टर, कापूस २ लाख २५ हजार हेक्टर, ज्वारी ७९००० हेक्टर, तुर ६७००० हेक्टर, मूग ३३००० हेक्टर तर उडिदाची ३२००० हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत आहे. (प्रतिनिधी)
यंदा झालेली तालुकानिहाय पेरणी
नांदेड २.४० टक्के, अर्धापूर ५.७० टक्के, मुदखेड १.७६ टक्के, लोहा ०३ टक्के, कंधार ३.१६ टक्के, देगलूर ४.११ टक्के, मुखेड ०६६ टक्के, नायगाव ०.८१ टक्के, बिलोली २८.६४ टक्के, धर्माबाद २७.८२ टक्के, किनवट ९५.८५ टक्के, माहूर २८.३३ टक्के, हदगाव ०३ टक्के, हिमायतनगर ३८.१४ टक्के, भोकर २३.२७ टक्के, उमरी ०२.३२ टक्के. याप्रमाणे पेरणीची टक्केवारी आहे.
गतवर्षी झालेली तालुकानिहाय पेरणी
नांदेड १००.८६ टक्के, अर्धापूर १२६.२० टक्के, मुदखेड १३८.१८ टक्के, लोहा १०७.७७ टक्के, कंधार ९९.११ टक्के, देगलूर १०१.२८ टक्के, मुखेड ९५.८१ टक्के, नायगाव १०७.९२ टक्के, बिलोली १४६.५९ टक्के, धर्माबाद १०९.११ टक्के, किनवट ११८.५५ टक्के, माहूर ८१.५५ टक्के, हदगाव ८३.९६ टक्के, हिमायतनगर १३७.९६ टक्के, भोकर १०५ टक्के, उमरी १३३ टक्के.