दक्षिण तटाला मत विभाजनाचा सुरुंग?
By Admin | Updated: June 16, 2014 00:25 IST2014-06-16T00:16:08+5:302014-06-16T00:25:28+5:30
शिवराज बिचेवार, नांदेड विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी मत विभाजन रोखण्यासाठी सर्वच मुस्लिम उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायला लावून मोठी खेळी

दक्षिण तटाला मत विभाजनाचा सुरुंग?
शिवराज बिचेवार, नांदेड
विधानसभा निवडणुकीत विद्यमान आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी मत विभाजन रोखण्यासाठी सर्वच मुस्लिम उमेदवारांचे अर्ज मागे घ्यायला लावून मोठी खेळी खेळली होती़ त्याचा त्यांना लाभही झाला, परंतु यावेळेस मुस्लिम समाजाच्या मतांसाठी काँग्रेसने दक्षिण तटाला लावलेला एमएलसीचा टेकू गळाला असून एमआयएमने रिंगणात उतरुन तटाला सुरुंग लावण्याची तयारी सुरु केली आहे़ त्यामुळे पोकर्णा यांच्या अडचणीत भरच पडणार आहे़
यापूर्वी शिवसेनेचे प्रकाश खेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उभे करुन मत विभाजनाची यशस्वी खेळी खेळली होती़ २००९ च्या निवडणुकीत सेनेचे हेमंत पाटील यांनी तोच प्रयत्न केला़ परंतु पोकर्णा यांनी पाटील यांचा डाव त्यांच्यावरच उलटवित सदरील उमेदवाराला आपल्या छत्रछायेत घेतले़ त्यात सेनेतील अंतर्गत गटबाजीचा फटकाही पाटील यांना बसला होता़ तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे पोकर्णा यांचा विजय सुलभ झाला होता़ परंतु यावेळी परिस्थिती बदलली आहे़ आ़पोकर्णा यांच्याकडून मतदारसंघात रस्ते, पाणी आदींची मोठ्या प्रमाणात कामे केल्याचे सांगण्यात येत आहे़ तर विरोधकांनी मात्र त्यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरुन टीका करण्याची एकही संधी सोडली नाही़ त्यात कत्तलखान्याचे भूतही आ़पोकर्णा यांच्या मानगुटीवर बसले आहे़
पोकर्णा यांचे सुपुत्र प्रवीण पोकर्णा यांची कत्तलखान्यात भागिदारी असल्याचे आरोप सेनेकडून होत आहे़ त्यावर पोकर्णा यांनी पाटील यांच्यावर दहा कोटींचा मानहानीचा दावाही ठोकला़ आगामी निवडणुका लक्षात घेता आरोप-प्रत्यारोपांची पातळी आणखी खालच्या दर्जापर्यंत जाण्याची शक्यता आहे़ दक्षिण नांदेड मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे़ त्यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी सभापती दिलीप कंदकुर्ते यांना डावलून अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालण्यात आली़ परंतु त्यानंतर विधान परिषदेवर मुस्लिम समाजातील नेतृत्वास संधी देण्याची मागणी पुढे आली़ अद्याप तरी, त्याला यश आले नाही़ त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटत आहे़ लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त असलेली एमआयएमही रिंगणात उतरणार असल्याने पोकर्णा यांच्या डोकेदुखीत वाढच होणार आहे़ त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फटका पोकर्णा यांना बसू शकतो़ तर दुसरीकडे मुस्लिमांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठी महापौर सत्तार यांच्या नावाचाही विचार करु शकतात़
इकडे शिवसेनेतही 'आॅल इज वेल' नाही़ पशुहत्या विरोधी समितीने काढलेल्या मोर्चाचे श्रेय घेण्यापलीकडे हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बहुतेक आंदोलनाला धार आली नाही़ त्यामुळे त्यांच्या जागी बालाजी पुयड यांच्या नावाची चर्चाही जोर धरु लागली आहे़ पुयड यांनी ग्रामीण भागात दौरे, कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचारही सुरु केला आहे़
पाटील यांच्यावर नाराज असलेल्यांचे पाठबळही त्यांना मिळत आहे़ लोकसभा निवडणुकीत स्टेशनवरच थांबलेले मनसेचे इंजिन विधानसभेमध्ये धावणार आहे़ त्यासाठी अॅड़ दिलीप ठाकूर हे तयारीत आहेत़ त्यामुळे दक्षिणेचा तट चौरंगी लढतीत रंगणार आहे़
शिवसेनाहेमंत पाटील ५३,९०४
बसपाईश्वर येमूल ९,३५४
काँग्रेस ओमप्रकाश पोकर्णा ७१,३६७
इच्छुकांचे नाव पक्ष
ओमप्रकाश पोकर्णा कॉंग्रेस
हेमंत पाटील शिवसेना
बालाजी पुयड शिवसेना
अॅड़दिलीप ठाकूर मनसे
लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण (काँग्रेस) यांना २७,०९६ एवढे मताधिक्य