पथदिवे काही उजळेनात..!
By Admin | Updated: December 19, 2014 00:55 IST2014-12-19T00:42:24+5:302014-12-19T00:55:43+5:30
जालना : अक्षय योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याने महावितरणने नगरपालिकेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने शहरातील पथदिवे बंद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

पथदिवे काही उजळेनात..!
जालना : अक्षय योजनेचे दोन हप्ते थकीत राहिल्याने महावितरणने नगरपालिकेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केल्याने शहरातील पथदिवे बंद असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
शहरात एकूण १३०० पथदिवे आहेत. मात्र त्यापैकी अनेक दिवे खराब झाल्याने बंद आहेत. पथदिव्यांच्या वीज बिलापोटी थकबाकीची रक्कम १४ कोटींवर गेल्याने दोन वर्षांपूर्वीपासून महावितरणने पालिकेच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यानंतर नगरपालिकेने केलेल्या पाठपुराव्यानंतर अभय योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला.
त्यामुळे पालिकेला ७ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा करावा लागणार होता. या योजनेअंतर्गत पालिकेला प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपयांचे चार हप्ते पाडून देण्यात आले होते. परंतु त्यापैकी दोन हप्ते पालिकेने भरणा केला. हप्ते नियमित सुरू झाल्यामुळे महावितरणने गेल्या दोन-अडीच महिन्यांपूर्वी पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केला होता.
परंतु पालिकेने पुन्हा हप्ते थकविले. दोन हप्ते थकीत राहिल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी शहरात काही भागात सुरू झालेले पथदिवेही सध्या बंद आहेत. पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार जाणवत असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. सायंकाळनंतर महिलांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे.
याबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पेंढारकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, पथदिव्यांसाठी महावितरणने १९३ कनेक्शन दिलेले आहेत. अभय योजनेअंतर्गत वीज बिलाची थकबाकी रक्कम भरण्यासाठी पालिकेला चार हप्ते पाडून देण्यात आले होते. परंतु त्यात खंड पडला. पालिकेचे हप्ते पूर्ववत सुरळीत व्हावे, यासाठी महावितरणकडून पाठपुरावा सुरू असल्याचे पेंढारकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)४
जालना नगरपालिकेसमोर आर्थिक पेच अद्यापही कायम आहे. शहरात वसुली मोहीम जोरदारपणे सुरू करण्यात आलेली असली तरी पालिकेला वीज देयकापोटी महावितरणचा हप्ता मोठ्या प्रमाणावर भरावा लागत आहे. १ कोटी ८० लाखांचे दोन हप्ते थकीत आहेत. शिवाय जायकवाडी-जालना पाणीपुरवठा योजनेच्या व पूर्वीच्या थकीत वीज बिलापोटी दरमहा ४० लाखांचा हप्ता भरावा लागत आहे.
४नोव्हेंबर २०१४ चा पाणीपुरवठा देयकाचा हप्ता अद्याप भरणा झालेला नाही.