तेरणा नदीतून मातीचा बेसुमार उपसा
By Admin | Updated: May 22, 2014 00:11 IST2014-05-22T00:01:18+5:302014-05-22T00:11:54+5:30
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़

तेरणा नदीतून मातीचा बेसुमार उपसा
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी जवळून वाहणार्या तेरणा नदी पात्रातून मातीचा बेसुमार उपसा केला जात आहे़ कोणत्याही परवानगीशिवाय केल्या जात असलेल्या उपशामुळे नदीकाठावरील वनराईतील वृक्षांची कत्तलही सुरु आहे़ याबाबत महसूल विभागाने पाटबंधारे विभागास कारवाईच्या सूचना करुनही त्याकडे डोळेझाक केली गेली़ औराद शहाजानीनजीक तेरणा नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ या बंधार्याच्या वरील बाजूस मोठ्या प्रमाणात वनराईची झाडे आहेत़ परंतु, एका खाजगी ठेकेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय नदीपात्रातील मातीचा बेसुमार उपसा केला आहे़ या मातीसाठी ठेकेदाराकडून नदीकाठावरील वनराईच्या वृक्षांची कत्तलही केली गेली आहे़ हा प्रकार महिन्याभरापासून अव्याहतपणे सुरू असताना पाटबंधारे विभागाने मात्र त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केलेली दिसते आहे़ यासंदर्भात निलंगा लोकलढा समितीच्या पदाधिकार्यांनी महसूल विभागाकडे तक्रार करुन हा प्रकार थांबविण्याची मागणी दीड महिन्यांपूर्वीच केली होती़ नदीपात्राशेजारील वनराईतील तब्बल ३०० हून अधिक झोडे तोडण्यात आल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे़ मात्र निवडणुकांमुळे महसूल विभागातील अधिकार्यांपर्यंत ही तक्रार पोहोचण्यास विलंब झाला़ दरम्यान, मतमोजणी होताच दुसर्या दिवशी निलंग्याच्या उपविभागीय अधिकार्यांनी पाटबंधारे विभाग व वन विभागास नैसर्गिक गौण खनिजाच्या हानीबाबत कळवून दोषींवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे केल्या़ तक्रारदारांनी गौण खनिज उपशामुळे नदीपात्राची दिशा बदलत असून, त्यामुळे तोंडावर आलेल्या पावसाळ्यात नदीला पूर आल्यास पाण्याचा प्रवाह बदलून नदीशेजारील शेकडो हेक्टर जमिनीचे नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली आहे़ त्यांनी याबाबत दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केलेली आहे़ त्यानुसार उपविभागीय अधिकार्यांनी कारवाईच्या सूचना केल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आहे़ त्यांनी पाहणी करुन वरिष्ठ अधिकार्यांकडे अहवाल पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे़ (प्रतिनिधी) पाटबंधारे विभागाचे औरादशहाजानी येथील अभियंता गोरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी तक्रारदारांच्या तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे सांगून याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवीत असल्याचे सांगितले़ तर त्यांच्याच कार्यालयातील कर्मचारी सोनकांबळे यांनी पाहणी केलेली असून, मातीचा उपसा झाल्याचे मान्य केले़ हा उपसा मंगळवारी थांबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले़ मातीच्या उपश्यामुळे नदीकाठच्या तीन-चार झाडांचे नुकसान झाले आहे़ परंतु, तक्रारदरार म्हणतात इतक्या झाडांचे नुकसान झाले नसल्याचे सोनकांबळे म्हणाले़