सामाजिक सलोखा, शांतता कायम राखावी - जिल्हाधिकारी
By Admin | Updated: October 7, 2014 00:13 IST2014-10-07T00:06:30+5:302014-10-07T00:13:51+5:30
नांदेड : अप्रिय घटनांचा निवडणूक काळात गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे़

सामाजिक सलोखा, शांतता कायम राखावी - जिल्हाधिकारी
नांदेड : अप्रिय घटनांचा निवडणूक काळात गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे़ तसे झाल्यास अशा घटकांबाबतही वेळीच माहिती द्या़ सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करा़ दरम्यान, सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर सेलचे लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले़
शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे़ नांदेडवासियांनी कोणतेही दडपण व दबावाखाली न राहता दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहनही धीरजकुमार यांनी केले आहे़ गाडीपुरा भागातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटना परिसराची जाऊन पाहणी केली़ यासंदर्भात धीरजकुमार म्हणाले, पोलिस दल व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वयातून परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण राखण्यात आले आहे़ परंतु अप्रिय घटनांच्या अडून अफवा पसरविणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ तसेच या दुर्देवी घटनेनंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण बंदोबस्त असल्याचेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)