सहा टक्के निधी अंगणवाडींच्या हक्काचा
By Admin | Updated: April 3, 2015 00:43 IST2015-04-01T00:44:36+5:302015-04-03T00:43:43+5:30
जालना : ग्रामपंचायतींच्या एकूण उत्पन्नामधील सहा टक्के निधी हा त्या गावातील अंगणवाड्यांच्या हक्काचा असून तो निधी त्यांना मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी केले.

सहा टक्के निधी अंगणवाडींच्या हक्काचा
जालना : ग्रामपंचायतींच्या एकूण उत्पन्नामधील सहा टक्के निधी हा त्या गावातील अंगणवाड्यांच्या हक्काचा असून तो निधी त्यांना मिळालाच पाहिजे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष तुकाराम जाधव यांनी केले.
मंगळवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकनाने सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शिक्षण व आरोग्य सभापती ए.जे. बोराडे, महिला व बालकल्याण सभापती मीनाक्षी कदम, समाजकल्याण सभापती शहाजी राक्षे, कृषी व पशुसंवर्धन सभापती लिलाबाई लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, वर्षा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जि.प. अध्यक्ष जाधव म्हणाले, १९५४ पैकी १५२ अंगणवाड्यांनी पहिल्या टप्प्यात आयएसओ मानांकनाचा दर्जा मिळविला आहे. पुढील वर्षी यापेक्षा दुप्पट अंगणवाड्यांनी हा दर्जा संपादन करावा, असे आवाहन करून समाजप्रबोधनाचे कार्य अंगणवाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हावे, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली. आएसओ दर्जा मिळविणाऱ्या अंगणवाड्यांनी सुमारे ५० लाखांची लोकवर्गणी जमवून विविध सुविधा निर्माण केल्या, ही विशेष उल्लेखनीय बाब असल्याबद्दल या अंगणवाड्यांचा गौरवही यावेळी करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष खोतकर, सभापती बोराडे यांचीही समयोचित भाषणे झाली. या सर्वांनी अंगणवाड्यांबद्दल गौरवोद्गार काढले. (प्रतिनिधी)