अपघातात भावंडांचा मृत्यू
By Admin | Updated: December 14, 2015 23:53 IST2015-12-14T23:52:44+5:302015-12-14T23:53:04+5:30
परंडा : कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात खानापूर (ता़उस्मानाबाद) येथील दोघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला़

अपघातात भावंडांचा मृत्यू
परंडा : कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात खानापूर (ता़उस्मानाबाद) येथील दोघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी दुपारी शहरानजीक परंडा- बार्शी राज्य मार्गावरील भैरवनाथ तालमीच्या समोर घडली़ तर भूम-वारदवाडी मार्गावरील जवळा फाट्यावर रविवारी रात्री जीप- दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील किशोर पांडुरंग सुतार यांच्या विवाह शुक्रवारी दुपारी शेळगाव (ता़परंडा) येथे होता़ या लग्नासाठी उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील विठ्ठल श्रीराम सुतार (वय-४७) व आण्णा श्रीराम सुतार (वय-५४) हे दोघे शेळगाव येथे आले होते़ लग्न लावल्यानंतर काही वेळाने विठ्ठल सुतार व आण्णा सुतार हे दोघे भावंडे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- व्ही़२१८५) परंडा मार्गे खानापूर या आपल्या गावाकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी परंडा- बार्शी राज्य मार्गावरील भैरवनाथ तालमीजवळ आली असता बार्शीहून भरधाव वेगात आलेल्या कारने (क्ऱएम़एच़१२- डी़ई़५२४८) जोराची धडक दिली़ हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला़ तर कार रस्त्याहून ५० फूट बाहेर शेतात फरफटत गेली़ अपघाताची माहिती मिळताच परंडा पोलीस व आरोग्य विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाला़ यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ़ संजय वाळके यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेद्वारे या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल सुतार व आण्णा सुतार यांना उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात पाठविले़ मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती या दोघांनाही मयत घोषित केले़ त्यामुळे मयतांचे शव परत परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़ तेथे शवविच्छेदन करून रात्री प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़
दरम्यान, परंडा तालुक्यातील भूम- वारदवाडी मार्गावरील जवळा फाट्यावरही रविवारी रात्री भरधाव वेगातील जीपने (क्ऱएम़एच़१२- ८२९३) दुचाकीला (क्ऱएम़एच़२५- वाय़४८३३) जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील आयुब बागवान (वय-३२) व बंडू राऊत (वय-३८) हे दोघे गंभीर जखमी झाले़ अपघातानंतर जीपचालक फरार झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)
परंडा शहरातील माळे गल्ली येथील किशोर सुतार यांच्या लग्नाला आलेल्या विठ्ठल सुतार आणि अण्णा सुतार यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच शहरातील त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती़ नवरदेवाचे चुलत बंधू शंकर सुतार यांची बहीण मृत्यू पावलेले विठ्ठल सुतार यांना देण्यात आली होती़ अपघातात जावायाचा मृत्यू झाल्याने मंगळवार पेठेतील माळेगल्लीवर शोककळा पसरली
४उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील दोन सख्ख्या भावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावावर एकच शोककळा पसरली़ मयत विठ्ठल सुतार व अण्णा सुतार या मनमिळावू बंधूंचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या कुटुंबियांनी परंड्याकडे धाव घेतली़ नातेवाईकांच्या आक्रोषाने येथील रूग्णालय परिसर हळहळला होता़