कुंभेफळला ‘रॅडिको’च्या दूषित पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:03 IST2017-10-08T00:03:20+5:302017-10-08T00:03:20+5:30
शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

कुंभेफळला ‘रॅडिको’च्या दूषित पाण्याचा वेढा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक परिसरातील रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज कंपनीने नाल्यामध्ये सोडलेले रसायनमिश्रित लाल रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी कुंभेफळ व परिसरातील दहा ते पंधरा गावांमध्ये शिरले असून नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. रसायनमिश्रित पाणी सोडण्यास कंपनीला तात्काळ प्रतिबंध करावे, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामराव शेळके व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली.
दोन वर्षांपूर्वी रॅडिको डिस्टिलरीजच्या दुर्गंधीयुक्त पाण्याविरुद्ध ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आपली कंपनी स्वत:हून बंद करावी, असे आदेश रॅडिको डिस्टिलरीजच्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते.
कंपनी बंद केली नाही, तर कंपनीविरुद्ध जलकायद्यानुसार कारवाई केली जाईल, तसेच कंपनीला केला जाणारा वीज पुरवठाही बंद करण्याचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. दरम्यान, महिनाभरासाठीच कंपनी बंद केली. मात्र, कंपनीने ‘ट्रिटमेंट प्लाँट’ सुरू केल्यानंतर उत्पादन प्रक्रिया पूर्ववत झाली. प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून घातक रसायनयुक्त पाण्याचे शुद्धीकरण केले जात होते; परंतु ऐन पावसाळ्यात कंपनीद्वारे रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया न करताच ते मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून देण्यात आले. यंदाही कंपनीने दूषित लाल रंगाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यामध्ये सोडून दिल्यामुळे कुंभेफळ गाव व लगतच्या दहा ते पंधरा गावांमध्ये हे पाणी शिरले असून नागरिकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. जवळपास २० ते २४ नागरिकांना ‘पोलिओ’ सारख्या रोगाची बाधा झाली आहे. हे पाणी पिल्यामुळे अनेक जनावरे मरण पावली आहेत. दुर्गंधीयुक्त वास आणि घातक लाल रंगाच्या रसायनयुक्त पाण्यामुळे कुंभेफळ आणि लगतच्या गावांतील नागरिक तसेच जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
कुंभेफळ व लगतच्या शिवारातील विहिरी, हातपंप, तलावांमध्ये घातक रसायनयुक्त लालरंगाचे पाणी आले आहे. कुंभेफळ गावाला औद्योगिक परिसराने पिण्याच्या पाण्याची सुविधा दिली असली, तरी जनावरांना मात्र विहिरी किंवा नदी-नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते.
सदरील कंपनीला तात्काळ प्रतिबंधित करावे, अशी मागणी सुधीर मुळे, ज्ञानेश्वर शेळके, बंडू शेळके, दादाराव शेळके, अशोक भावले, बाळू गोजे, शोभा गोजे, प्रल्हाद गावडे, कल्याण कुबेर, भाऊराव शिंदे, कैलास कैलकर आदी नागरिकांनी केली
आहे.