लॉकडाऊनच्या आड; बालविवाहांचा जुगाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:04 IST2021-05-17T04:04:11+5:302021-05-17T04:04:11+5:30
कारवाई: बोहल्यावर चढण्यापासून ५२ अल्पवयीन जोडप्यांना रोखले औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ५२ ...

लॉकडाऊनच्या आड; बालविवाहांचा जुगाड
कारवाई: बोहल्यावर चढण्यापासून ५२ अल्पवयीन जोडप्यांना रोखले
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ५२ बालविवाह उधळून लावत कारवाई केली.
लॉकडाऊनमुळे कुणीही येणार नाही, कमीत-कमी पाहुण्यांत लग्नाचा बार उडवून टाकाण्याच्या इराद्याने जुळलेली ही अल्पवयीन नाती कायद्याच्या कचाट्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात एकूण ५२ बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने थांबवून बालकांना आश्रय देत त्यांचे समुपदेशन करण्यात आले. औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १६ बालविवाह रोखण्यात आले आहेत. त्याखालोखाल पैठण तालुक्याचा समावेश आहे.
बालविवाहांची माहिती मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, कल्पना मोहिते, सुप्रिया इंगळे, सामाजिक कार्यकर्ते दीपक बजारे, सोनू राहिंज, सुनील गायकवाड, कैलास पंडित आदींनी बालविवाह थांबविले. ज्योती पत्की, मनोहर बन्सवाल, शिऊरकर, मेघना चपळगावकर आदींची टीम मुलांचे समुपदेशन करीत आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय बालविवाहांची संख्या
औरंगाबाद-१६
पैठण-१३
सिल्लोड-०८
वैजापुर-०१
गंगापुर-०८
कन्नड-०३
फुलंब्री-००
खुलताबाद-०१
सोयगाव-०१
एकूण ५२