शिवसेनेला सत्तेची नव्हे, जनतेची गरज

By Admin | Updated: September 3, 2016 00:30 IST2016-09-03T00:19:05+5:302016-09-03T00:30:05+5:30

लातूर : शिवसेनेला सत्तेची गरज नसून, केवळ जनतेची गरज आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, शेतकऱ्यांच्या समस्या विधानसभेत मांडून

The Shivsena, not the power, but the power of the people | शिवसेनेला सत्तेची नव्हे, जनतेची गरज

शिवसेनेला सत्तेची नव्हे, जनतेची गरज


लातूर : शिवसेनेला सत्तेची गरज नसून, केवळ जनतेची गरज आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, शेतकऱ्यांच्या समस्या विधानसभेत मांडून त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, असा विश्वास देत शिवसेनेचे एक राज्यमंत्री, खासदार व पाच आमदारांनी शुक्रवारी जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, औसा, देवणी, चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट तालुक्यात आमदार महोदयांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. औसा तालुक्यातील खरोसा, लामजना येथे आमदार सुरेश गोरे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी बागायती अनुदान मिळाले नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. घरकुल योजनेतील जागेची अट तसेच लक्ष्मी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे अडकलेले ७ कोटींचे बिल देण्याचीही मागणी केली. दरम्यान, आमदार सुरेश गोरे म्हणाले, शिवसेनेला सत्तेची गरज नाही, जनतेची गरज आहे. म्हणून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही लातूर जिल्ह्यात दोन दिवस पीक परिस्थिती व दुष्काळातील उपाययोजनांची माहिती जाणून घेत आहोत. या माहितीचा अहवाल पक्ष प्रमुखांकडे सादर केला जाईल. शिवाय, जनतेच्या समस्या विधानसभेत मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
चाकूर तालुक्यातील नळेगाव, चापोली येथे खासदार अरविंद सावंत यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळी उपाययोजनांचा आढावाही त्यांनी घेतला. चापोली येथील लोकसहभागातून करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारातील जलपूजनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ज्या-ज्यावेळी शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येते, त्या-त्यावेळी शिवसेना धाऊन येते. मराठवाडा अद्यापही दुष्काळातून सावरलेला नाही. लातुरात त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेशही दिले.
उदगीर तालुक्यात आमदार प्रसाद आबीटकर यांनी डिग्रस, करडखेल, पिंपरी, मोर्तळवाडी, नळगीर, डोंगरशेळकी आदी गावांना भेटी देऊन पीक परिस्थिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी पावसाअभावी सोयाबीन पीक वाळून गेल्याचे आमदार आबीटकर यांच्या निदर्शनास आणून दिले. देवणी तालुक्यात धनेगाव, जवळगा येथील पिकांची पाहणी आमदार अजय चौधरी यांनी केली. धनेगाव बॅरेजेसच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मावेजा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर त्यांनी देवणी तहसील कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना केल्या.
निलंगा तालुक्यात आमदार सुरेश गोरे यांनी मन्मथपूर, धानोरा शिवारातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. तेरणा नदीवर झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत काम झाले आहे. परंतु, गेट न बसविल्यामुळे पाणी वाहून गेले असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. यावेळी आमदार गोरे यांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांना गेट बसविण्यासंदर्भात सूचना केल्या. शिरूर अनंतपाळ तालुक्यात आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शिवपूर, आरी, आनंदवाडी, पांढरवाडी, सय्यद अंकुलगा आदी गावांतील पिकांची पाहणी केली. घरणी प्रकल्पाला भेट देऊन पाणीसाठ्याची स्थिती जाणून घेतली. आरी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने नुकसान झालेल्या शेतीचीही त्यांनी पाहणी केली. (वार्ताहरांकडून)

Web Title: The Shivsena, not the power, but the power of the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.