शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला

By Admin | Updated: April 19, 2016 00:52 IST2016-04-19T00:42:14+5:302016-04-19T00:52:44+5:30

औरंगाबाद : सातारा-देवळाईच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे

Shiv Sena got very confident | शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला

शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला

औरंगाबाद : सातारा-देवळाईच्या निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तर भाजपला संघाने मदतीचा हात दिल्यामुळे देवळाईची जागा भाजपच्या पारड्यात गेली. साताऱ्याची जागा थोड्या मतांनी सेनेच्या हातून निसटली आणि काँग्रेसला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस तर दोन्ही वॉर्डात हिशोबातही आले नाही.
सातारा हरल्याचे दु:ख नाही; परंतु देवळाई वॉर्डात पराभव झाल्याचे शिवसेनेला पचनी पडणे अवघड झाले आहे. पालकमंत्री विरुद्ध खासदार अशा पद्धतीने या निवडणुकीत शिवसेनेत दुफळी निर्माण झाली होती, तर भाजपमध्येही दुफळी होतीच; परंतु ग्रामीण पकड आणि नेटवर्कमुळे भाजपला सेनेच्या वाट्याची एक जागा पळविणे शक्य झाले. निवडणुकीच्या तोंडावर देवळाईत भाजपने रोज ‘भूपाळी’ सुरू केल्यामुळे संघाचे मतदान घट्ट झाले. मनपा सार्वत्रिक निवडणुकीनंतर या पोटनिवडणुकीत युती तुटल्यामुळे सेना-भाजप स्वतंत्र लढले. यात सेनेचे पानिपत झाले तर भाजपला एक महत्त्वाची जागा मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युतीही या निवडणुकीत नव्हती. साताऱ्यावर काँग्रेसला विजय मिळविणे शक्य झाले. राष्ट्रवादी या दोन्ही वॉर्डांमध्ये हिशोबातही न आलेला पक्ष ठरला. भाजप आणि काँगे्रसच्या वाट्याला एकेक जागा आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला तर शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला आहे. भाजपला आगामी काळात आता सेनेसोबत युती करण्याची गरज राहणार नाही, असा संदेश यातून मिळाला आहे. तर सेनेला संघटनात्मक काम करण्यासाठी वेगळ्या वाटेने जावे लागणार आहे. धनशक्तीमुळे देवळाईत पराभव झाल्याचा दावा सेनेच्या गोटातून करण्यात येत आहे. सेना सध्या राज्यात आणि मनपात सत्तेत आहे, याचा विसर दावा करणाऱ्यांना पडला आहे.
संघ दक्षतेमुळे भाजप सक्षम
भाजपचा विजय व्हावा यासाठी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या नियोजनाखाली ही पहिलीच पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांना काठावर का होईना यश मिळाले. प्रशांत देसरडा आणि सुरेंद्र कुलकर्णी यांनी देवळाईसाठी परिश्रम घेतले. जंजाळ यांनी शिवाजीनगरची संघ शाखा बंद केल्याचा वेगळा प्रचार करून संघाला भाजपने अंतर्गत कामाला लावले. त्याचा परिणाम म्हणजे देवळाईतील १२ संघदक्ष वसाहतींमधील मतदान भाजपच्या पारड्यात गेले. शिवाय सेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपने गळाला लावून त्यांना फितविले. हिवाळे परिवारातील भाऊबंदकीच्या राजकारणात विनायक हिवाळे यांनी रात्रीतून जादू केल्यामुळे त्यांचे चिरंजीव भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे यांना फायदा झाला. सेना दुसऱ्या, तर काँगे्रस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. शिवसेनेला पोषक असलेला; परंतु आता भाजपचा गड म्हणून देवळाई वॉर्ड पुढे आला आहे.
काँगे्रसला गड राखण्यात यश
काँगे्रसच्या सायली जमादार यांना साताऱ्यातून विजय मिळण्यामागे आ.सुभाष झांबड, फिरोज पटेल यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. सातारा गाव वगळता बाहेरील मतदान जमादार यांना जमविता आले. सातारा हा काँग्रेसचाच गड असल्याचे सिद्ध झाले. सेना आणि भाजपमध्ये गावातील मते विभागली गेली. सेना दुसऱ्या तर भाजपच्या बावस्कर या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या. देवळाईमध्ये काँग्रेसने राजेंद्र नरवडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांच्या पक्षबदलूपणामुळे तेथे काँगे्रसचे नुकसान झाले. जमादार यांना सर्वव्यापी मतदान झाल्याने त्यांनी शिवसेनेच्या पल्लवी गायकवाड यांचा थोड्या फरकाने पराभव केला. गायकवाड या खा.खैरे पुरस्कृत उमेदवार असल्यामुळे शिवसेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांपैकी अनेकांनी त्या वॉर्डात नियोजन करण्यात आखडता हात घेतला. एकमेकांवर कुरघोडी आणि सामूहिक लगीनघाई यामुळे सातारा-देवळाईतून सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. सेनेने सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त पक्षप्रमुखांची सभा घेतली; परंतु त्याचा परिणाम या निवडणुकीवर झाला नाही. २०२० मध्ये देवळाई या वॉर्डाचे चार वॉर्ड होतील. साताऱ्याचे तीन वॉर्ड होतील. ७ वॉर्डांचा तो पट्टा आज शिवसेनेच्या अधिपत्याखाली नसून काँग्रेस आणि भाजपच्या ताब्यात गेला आहे. भाजपने ताकद पणाला लावली, नियोजन केले, तर शिवसेना अतिआत्मविश्वास आणि गटबाजीमुळे पराभवाच्या गर्तेत आली. तर काँग्रेसला त्या दोनपैकी एका वॉर्डातून भाग्याने साथ दिल्याने त्यांचा आवाज आता वाढणार आहे. राष्ट्रवादीला तर साताऱ्यात उमेदवारच नव्हता. देवळाईत उमेदवार होता; परंतु त्या उमेदवाराला वॉर्डाचा अंदाज घेता आला नाही. परिणामी त्या दोन्ही वॉर्डांत राष्ट्रवादी शून्यावर आली. अप्पासाहेब हिवाळे, नरवडे, जमादार ही सेनेच्या तंबूतून बाहेर पडलेली मंडळी. यांनीच सेनेला धूळ चारली.
शिवसेनेला असा बसला फटका
१५ दिवसांपासून दोन्ही वॉर्डांत प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पालकमंत्री रामदास कदम यांनी देवळाईतील शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे यांच्या प्रचार कार्यालयाचा नारळ फोडल्याने खा.चंद्रकांत खैरे यांच्या जिव्हारी लागले. येथे सेनेच्या उमेदवाराचे खच्चीकरण झाले. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांच्यावर देवळाईची जबाबदारी दिल्यामुळे पक्षातील उर्वरित पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतले. मुळात तो पश्चिम मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे. आ.संजय शिरसाट यांनी त्या दोन्ही वॉर्डांतील उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु त्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते अंडरग्राऊंड होते. आ.शिरसाट यांना भविष्यात या निवडणुकीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपला देवळाईच्या रुपाने आगामी काळात थेट २५ हजार मतांची व्होट बँक मिळाली आहे. आ.शिरसाट गेल्या विधानसभेत फक्त ७ हजार मतांनी निवडून आलेले आहेत. विधानसभेत भाजपला त्या दोन्ही वॉर्डांतून मताधिक्य होते. त्यामुळे देवळाई हा वॉर्ड भाजपला पश्चिम मतदारसंघासाठी पोषक ठरू शकतो.
विश्लेषण- विकास राऊत

Web Title: Shiv Sena got very confident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.