शिवसेनेकडून दररोज ९ लाख लिटर पाणी

By Admin | Updated: May 5, 2016 00:23 IST2016-05-05T00:15:57+5:302016-05-05T00:23:55+5:30

लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.

Shiv Sena gets 9 lakh liters of water daily | शिवसेनेकडून दररोज ९ लाख लिटर पाणी

शिवसेनेकडून दररोज ९ लाख लिटर पाणी

पक्ष प्रमुखांच्या हस्ते शुभारंभ : ५० टँकरच्या दररोज दीडशे फेऱ्या...
लातूर : शिवसेनेच्या वतीने मोफत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. ५० टँकरच्या प्रत्येकी तीन फेऱ्या याप्रमाणे दररोज दीडशे फेऱ्या करून ९ लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जाणार आहे. यापूर्वी दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. आता त्यात ४० टँकरची वाढ केली असल्याची माहिती यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली.
लातूर शहर व जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मनपाकडून १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवसेनेकडूनही दहा टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. बुधवारपासून त्यात टँकरची वाढ करण्यात आली आहे. ४० टँकरची अतिरिक्त वाढ केल्याने आता ५० टँकरने शिवसेनेकडून पाणीपुरवठा होणार आहे. दररोज ९ लाख लिटर्स पाणी नागरिकांना वितरण करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे असल्याचे संपर्क प्रमुख सावंत यांनी सांगितले. लातूर शहरात कचऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला असून, जागोजागी कचरा साचतो आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रत्येक प्रभागात कचरा कुंड्या देण्याचे नियोजन केले आहे. प्रारंभी शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या नऊ प्रभागांत कचरा कुंड्या देण्यात येणार आहेत. त्याचाही प्रारंभ बुधवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.
शिवसेना नगरसेवक असलेल्या प्रभागांत कचरा कुंड्या दिल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागांत कचरा कुंड्या दिल्या जाणार आहेत. स्वच्छ शहर, सुंदर शहर... ही संकल्पना शहराची आहे. परंतु, डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात कचरा साचत आहे. त्यामुळे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी वरवंटी येथील कचरा डेपो परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेतले असून, मनपा प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत.
परंतु, शिवसेनेच्या वतीने कचरा रस्त्यावर दिसू नये म्हणून शिवाय कचरा उचलण्यास सोपे जावे म्हणून कचरा कुंड्या दिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींना प्रत्येकी एक टाकी देण्याचे नियोजन केले असून, त्याचाही शुभारंभ पक्ष प्रमुखांच्या हस्ते करण्यात आला. तीन हजार लिटर्स क्षमतेच्या या टाक्यांचे ग्रामपंचायतींकडे लोकार्पण केले असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी दिली. (प्रतिनिधी)
सामाजिक बांधिलकी...
लातूर जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. यंदा तर तीव्र पाणीटंचाई आहे. दोन महिन्यांपासून नळाला पाणी बंद आहे. शासन व प्रशासन त्यांच्या पातळीवर पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न करीत आहे. शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जोपासत पाणी वितरणासाठी ५० टँकरची सोय करून दररोज ९ लाख लिटर्स पाणी वाटप केले जाणार आहे.

Web Title: Shiv Sena gets 9 lakh liters of water daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.