विहामांडवा बाजारपेठेत शुकशुकाट
By Admin | Updated: April 16, 2016 01:43 IST2016-04-16T00:55:31+5:302016-04-16T01:43:55+5:30
विहामांडवा : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील उत्पन्नाअभावी आर्थिक व्यवहार थंडावल्यामुळे विहामांडवा बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे.

विहामांडवा बाजारपेठेत शुकशुकाट
विहामांडवा : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील उत्पन्नाअभावी आर्थिक व्यवहार थंडावल्यामुळे विहामांडवा बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यावसायिकदेखील आर्थिक संकटात सापडले आहेत.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. नुकताच गुढीपाडवा झाला. रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती आदी जयंत्याही याच महिन्यात साजऱ्या होत आहेत. त्यामुळे या कालावधीत बाजारपेठ ग्राहकांनी गजबजलेली असते. दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने व्यापारी वर्गाला या हंगामाची प्रतीक्षा असते. निसर्गाच्या अवकृपेमुळे चार वर्षांपासून अपुऱ्या पर्जन्यमानाचा फटका शेतीसोबतच बाजारपेठेलाही बसला आहे. शेतातील उत्पन्न घटल्याने बळीराजा आणि शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. उत्पन्नाअभावी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन देण्या-घेण्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत. वेळेवर कर्जफेड न करता आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक पत अडचणीत सापडली आहे. उत्पन्नाअभावी घेतलेले कर्ज फेडावे कसे आणि कधी फेडावे तसेच संसाराचा गाडा कसा चालवावा? अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे.