शहागंज बसस्थानक टाकणार कात
By Admin | Updated: July 21, 2014 00:35 IST2014-07-21T00:01:09+5:302014-07-21T00:35:00+5:30
औरंगाबाद : औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस. टी. महामंडळाने मागविलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

शहागंज बसस्थानक टाकणार कात
औरंगाबाद : औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बीओटी तत्त्वावर अद्ययावत आणि सुसज्ज बसस्थानक बांधण्यासाठी एस. टी. महामंडळाने मागविलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला आहे. निविदा प्रक्रिया सुरू असून, आता एस. टी. च्या ‘बीओटी’चे पुढील लक्ष्य आहे, शहागंज येथील बसस्थानकाची जागा. ही जागाही बीओटीवर विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शहागंज बसस्थानकातून पूर्वीप्रमाणे बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. महामंडळाची येथे जवळपास दोन एकर जागा असून, येथील बससेवा बंद पडल्यापासून ही जागा पडून आहे. ही जागा बीओटी तत्त्वावर विकसित केल्यास एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात भर पडेल, यादृष्टीने महामंडळाची ही जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विचार केला जात आहे. या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याबाबत विचाराधीन असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती.
राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे नुकतेच शहर आणि परिसरातील महामंडळाच्या जागा बघण्यासाठी आले होते. शहागंज येथील जागेत बीओटीवर कॉम्प्लेक्स तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती बसस्थानकानंतर शहागंज येथील जागा बीओटी तत्त्वावर विकसित केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले.
सुविधा मिळणार?
शहर विस्तारत असल्यामुळे महामंडळाच्या या जागांवर प्रकल्प राबविल्यानंतर आगामी काही वर्षांत एस. टी. च्या विस्तारासाठी महामंडळाला स्थानकासाठी जागा शोधावी लागेल ती शहराच्या हद्दीबाहेर. त्यासाठी कोट्यवधींची गुंतवणूक महामंडळाला करावी लागेल.
वाहतुकीच्या वर्दळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना बसस्थानकात सध्या मिळत असलेल्या सुविधांमध्ये या प्रकल्पानंतर वाढ होईल का, असा प्रश्न प्रवाशांसमोर आहे.
शहागंजमधून दर दहा मिनिटांनी निघेल बस
१ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली जाणार असून, प्रारंभी महावीर चौक- चिकलठाणा, शहागंज- रेल्वेस्थानक या दोन मार्गांवर बससेवेत वाढ केली जाणार आहे.
या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावणार असून त्यामुळे अधिक चांगली सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
बससेवा राहील?
शहागंज परिसरात वाढलेली अतिक्रमणे, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने, यामुळे बससेवा सुरू करण्यास अडचणी असल्याचे सांगितले जाते. या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचा घाट घातला जात आहे का?, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
बससेवेसाठी जागा
शहागंज येथील जागेत व्यापारी संकुलाबरोबर बससेवेसाठीही जागा राहील. त्यामुळे या जागेवर केवळ व्यापारी संकुल राहणार नसल्याचे विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी सांगितले.