दुष्काळी स्थितीची आठवडी बाजारावर छाया

By Admin | Updated: July 7, 2014 00:13 IST2014-07-06T23:23:25+5:302014-07-07T00:13:59+5:30

परंडा : पावसाळा सुरु होऊन आज तब्बल एक महिना झाला आहे. मात्र, अद्यापि पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

Shadow on the market of drought situation for weeks | दुष्काळी स्थितीची आठवडी बाजारावर छाया

दुष्काळी स्थितीची आठवडी बाजारावर छाया

परंडा : पावसाळा सुरु होऊन आज तब्बल एक महिना झाला आहे. मात्र, अद्यापि पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊसच नसल्याने नव्याने पालेभाल्यांची लागवड होऊ शकली नाही. परिणामी बाजारात ज्या काही पालेभाज्या येत आहेत, त्याचे दरही गगनाला भिडले आहेत. पावसाअभावी तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. रविवारच्या आठवडी बाजावर दुष्काळी स्थितीची छाया दिसून आली. प्रस्तुत प्रतिनिधीने व्यापारी, शेतकऱ्यांशी चर्चा केली असता एकूणच उलाढाल कमी झाल्याचे दिसले. एरव्ही बाजारपेठेत ग्रामीण भागातील बाजारकरूंची अधिक गर्दी असते. मात्र, ६ जुलै रोजीच्या बाजारात नहमीपेक्षा गर्दी कमीच होती.
जुलै महिना सुरु झाला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वाहणारे वारे अन् त्यासोबत कडक ऊन पडत असल्याने पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे. दुष्काळी स्थितीचा परिणाम आता बाजारपेठेवरही होऊ लागला आहे. सर्वाधिक परिणाम रविवारच्या (दि.६) आठवडी बाजारावर दिसून आला. एरव्ही सकाळी ११ वाजलेपासूनच बाजार फुलायला सुरूवात होते. तर बाजारातील गर्दी सायंकाळी पाच वाजेपर्यत कायम असे. मात्र, आज दुपारच्या वेळी आठवडे बाजारात फेरफटका मारला असता. ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली. एकूण बाजारकरूंचा विचार केला असता सर्वाधिक शहरातीलच नागरिक होते. ग्रामीण बाजारकरू विरळच दिसत होते. आठवडी बाजाराचा मुख्य घटक म्हणून पालेभाज्या विक्रेत्यांकडे पाहिले जाते. मात्र, तुरळक गर्दीचा सर्वाधिक फटका या विक्रेत्यांना बसला. बाजाराच्या अनुषंगाने अनेक विक्रेते बाजार समितीच्या लिलावात सहभाग घेऊन पालेभाज्या खरेदी करतात. दिवसभर हा माल विकून सकाळी खरेदी केलेल्या मालाची रक्कम सायंकाळी कमिशन एजंटला द्यावी लागते. परंतु, दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने खेडेगावांतून येणाऱ्या बाजारकरूंची संख्या रोडावली. परिणामी विक्रेत्याना माल विकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. एरव्ही बाजार परिसरातील हॉटेल्समध्ये ग्राहकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येते. मात्र, आज याच्या उलट चित्र नजरेस पडले. याचा फटका हॉटेल व्यवसायिकांना सोसावा लागला. अन्य व्यवसायिकही ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत होते. (वार्ताहर)
पावसाने ओढ दिल्याने लिलाव बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे सबंधीत वाणाची बोली वाढत गेली. त्यामुळे एरव्हीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले. परिणामी आजच्या बाजारात जास्त दराने भाज्या विकाव्या लागल्या. चार पैसे मिळतील या आशेवरच आम्ही विक्री करतो. जास्त काही नाही, किमान दिवसभराचा रोजगार निघावा, हीच अपेक्षा असते.
- आमोल सूर्यवंशी,
पालेभाज्या विक्रेते,
सोनगिरी.
मी भुसार मालाचा व्यापारी आहे. परंडा तालुक्यासह करमाळा, जामखेड तालुक्यातील प्रमुख बाजारात भूसार मालाचा व्यापार करतो. मागील आठ दिवसांपासून बहुतांश ठिकाणच्या बाजारावर दुष्काळी स्थितीतीच छाया दिसून आली. एक किलो धान्य वा अन्य वस्तू खरेदी करणारा ग्राहक अर्धा किलोवर आला आहे. दाळी, शेंगदाणे, तेल या व्यतिरिक्त दुसरा माल घेण्यास ग्राहक धजावत आहे.
- नंदकुमार पेठकर, भूसार माल विक्रेते, करमाळा.
दुष्काळामुळे बाजारात येणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याचा फटका फळ विक्रीला बसत आहे. मुळात फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असते. असे असतानाच बाजारातील ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
- युसूफ शेख,
फळ विक्रेते, परंडा.
रविवारच्या आठवडी बाजार दिवशी प्रवाशाची मोठी गर्दी उसळते. यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांचे प्रमाण एरव्हीपेक्षा पाच पटीने वाढते. मात्र आजच्या आठवडी बाजाराचे वेगळेच चित्र दिसून आले. प्रवाशाची संख्या कमी झाल्याने फेऱ्यांची संख्याही घटली. त्यामुळे हाही व्यवसाय संकटात सापडला आहे.
- कालीदास जाधव,
टमटमचालक
पावसाने ओढ दिल्याने सर्वाधिक फटका पानमळ्यांना बसला आहे. सांगोला, अकलूज, सांगली या ठिकाणाहून येणाऱ्या पानाची आवक कमी झाल्याने हैदराबाद, बंगळुरू येथून पानाची खरेदी करावी लागत आहे. यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. असे असतानाच ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. जादा पैसे देण्यास ग्राहक धजावत नाहीत.- अनिस तांबोळी, ठोक विक्रेते
सर्वसाधारणपणे बाजाराला ४०० रुपये लागतात. या हिशोबाने बाजारात गेलो, मात्र आज पालेभाज्यासह इतर वाणाची खरेदी करीत असताना किलोमागे दहा ते वीस रूपयांचा फरक पडत गेला. त्यामुळे पाच ऐवजी तीन पुरेल ऐवढाच भाजीपाला घेता आला. दुष्काळसदृश्य स्थितीमुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. याचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बसत आहे.
- दीपक भापकर, खासापुरी, बाजारकरू.
दरवेळी बाजाराच्या दिवशी हॉटेलमध्ये ग्रामीण भागातील लोकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. खाद्यपदार्थांसोबतच चहालाही मोठी मागणी असते. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे. आज तर ग्राहकांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर व्यवसाय करणे अवघड होईल.
- शिराज पठाण,
हॉटेल मालक,
आठवडी बाजार परंडा.

Web Title: Shadow on the market of drought situation for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.