लातुरात भीषण पाणीटंचाई; चाकूरच्या वॉटर पार्कमध्ये उधळपट्टी !
By Admin | Updated: April 14, 2016 01:06 IST2016-04-14T00:49:40+5:302016-04-14T01:06:33+5:30
संदीप अंकलकोटे , चाकूर लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की

लातुरात भीषण पाणीटंचाई; चाकूरच्या वॉटर पार्कमध्ये उधळपट्टी !
संदीप अंकलकोटे , चाकूर
लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की लातूर शहरावर असताना चाकूर येथील वृंदावन वॉटर पार्कमध्ये मात्र पाण्याची उधळपट्टी राजरोस सुरू आहे. स्वत:च्या मालकीच्या बंधाऱ्यातून पार्कला पाणी वापरले जात असले, तरी तहानलेल्यांना ते मिळत नाही. व्यवसायासाठी या पाण्याचा वापर राजरोसपणे होत आहे.
चाकूर येथे वृंदावन अॅम्युजमेंट वॉटर पार्क आहे. या वॉटर पार्कचा परिसर दोन एकरच्या आसपास असून, पाण्याचे मोठे तीन हौद आहेत. ९ ते १० हजार लिटर्स क्षमतेचा हा वॉटर पार्क असून, स्वत:च्या बंधाऱ्यातील पाणी वॉटर पार्कसाठी वापरले जाते. एकूण ५ बंधारे आहेत. त्यात पाणी साठवून ठेवलेले आहे. हे पाणी पिण्यासाठी न देता वॉटर पार्कसाठी वापरले जाते.
दररोज शेकडो पर्यटक या पार्कला भेटी देतात. बुधवारी २५ ते ३० पर्यटकांनी वॉटर पार्कचा आनंद लुटला. गेल्या आठ दिवसांत ५०० ते ७०० पर्यटकांनी भेटी देऊन वॉटर पार्कमधील पाणी खेळण्यासाठी वापरले.
दिवसाला ३०० रुपये तिकीट वृंदावन अॅम्युजमेंट वॉटर पार्कसाठी आकारले जाते. या वॉटर पार्कसाठी किमान ८ ते १० हजार लिटर्स पाणी वापरले जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. लातूर शहर व चाकूर तालुकाही टंचाईत होरपळला जात असताना वॉटर पार्कमध्ये मात्र बेसुमार पाण्याचा वापर केला जात आहे. चाकूर तालुक्यातील नदी, विहिरी, पाझर तलाव व सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. अशा परिस्थितीतही वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात साठविलेल्या पाण्याचा वापर बेसुमार होत आहे. चाकूर तालुक्यातील सध्या १९ गावांना २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, १०८ गावे व वाडी-तांड्यांना १०८ अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून पाणीपुरवठा केला जातो. वॉटर पार्कमधील बंधाऱ्यात पाणी साठवून ठेवले असताना तेथील अधिग्रहण मात्र कोणीही केलेले नाही. परिणामी, वृंदावन वॉटर पार्कमध्ये पर्यटक मनमुराद आनंद घेऊन पाण्याची उधळपट्टी करीत आहेत.
वॉटर पार्कमध्ये असलेल्या बंधाऱ्यातील गढूळ पाणी फिल्टर करून वापरले जाते. हे पाणी पिण्यायोग्य नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी असून, त्या पाण्याचा वापर वॉटर पार्कसाठी केला जातो. सध्या टंचाई असल्यामुळे वॉटर पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. दिवसाला १० ते १२ आणि रविवारच्या सुटीच्या दिवशी ४० च्या आसपास पर्यटक येतात. पाणीच नाही. त्यामुळे पाण्याचा बेसुमार वापर होण्याचा प्रश्नच नाही. साठवून ठेवलेले गढूळ पाणी फिल्टर करून पुन्हा वापरले जाते. हे पाणी संपल्यानंतर वॉटर पार्क बंदच ठेवावा लागेल. कर्मचारी व पशुधनासाठी टँकरने पाणी विकत घेतो. परंतु, वॉटर पार्कसाठी १२ लाख लिटर्स गढूळ पाणी साठवून ठेवले आहे. त्याचाच पुनर्वापर आम्ही करतो, असे वॉटर पार्कचे संचालक उत्तमराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.