सात आरोग्य केंद्र डॉक्टरांविना !

By Admin | Updated: July 11, 2016 00:23 IST2016-07-11T00:11:04+5:302016-07-11T00:23:10+5:30

उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार बळावू लागले आहेत. असे असतानाच सर्वसामान्यांसाठी किफायतशीर ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एक -दोन नव्हे,

Seven health centers without doctors! | सात आरोग्य केंद्र डॉक्टरांविना !

सात आरोग्य केंद्र डॉक्टरांविना !



उस्मानाबाद : सध्या पावसाळ्याचे दिवस असून साथीचे आजार बळावू लागले आहेत. असे असतानाच सर्वसामान्यांसाठी किफायतशीर ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या एक -दोन नव्हे, तब्बल सात प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांविनाच सुरू आहेत. येथील प्रत्येकी दोन्ही डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. उर्वरित केंद्रांतही काही समाधानकारक चित्र नाही. जेथे दोन डॉक्टरची गरज आहे, तेथे एकेकच डॉक्टर कार्यरत आहेत. मिटींग काही कार्यालयीन काम निघाल्यास सदरील आरोग्य केंद्रही रामभरोसे असतात. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही या ठिकाणी डॉक्टरांच्या रिक्त जागांमुळे आरोग्य सेवेचे तीन-तेरा झाले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर आरोग्य सेवा सुधारेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु, आजही डॉक्टरांच्या रिक्त जागांचा प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. उलट पूर्वीच्या तुलनेत अधिक गंभीर बनला आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४२ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविली जातात. बहुतांश केंद्रांना सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा रिक्त जागांचा प्रश्न भेडसावित आहे. प्रत्येक आरोग्य केंद्राला दोन डॉक्टर असणे अपेक्षित आहे. परंतु, सात आरोग्य केंद्र अशी आहेत, की जेथे एकही डॉक्टर कार्यरत नाही. त्यामुळे या केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना कर्मचाऱ्यांच्या हातूनच औषध, गोळ्या घेऊन घरचा रस्ता धरावा लागत आहे. आजाराचे निदान झालेले नसते. त्यामुळे सदरील गोळ्यांच्या माध्यमातून आजार बरा होईलच, याची शास्वती नसते. परिणामी रूग्णांना ऐपत नसतानाही खाजगी दवाखान्याचा उंबरठा ओलांडावा लागत आहे. आजघडीला येरमाळा, केशेगाव, आनाळा, जवळा (नि), काटगाव, सावरगाव, पारा ही आरोग्य केंद्र रामभरोसे सुरू आहेत. याचा फटका रूग्णांना सोसावा लागत आहे. ठोकताळ्यानुसार येथील औषध निर्माण अधिकारी अथवा अन्य कर्मचारी गोळ्या, औषधे देत आहेत. परंतु, आजाराचे योग्य निदान होत नसल्याने आजार बरा होत नाही, असे रूग्णांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देऊन विशेष बाब म्हणून रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहेत. (प्रतिनिधी)
दुष्काळी जिल्हा म्हणून शासनाने जिल्हास्तरावरच भरती प्रक्रिया राबविण्याबाबत स्वतंत्र आदेश काढले होते. त्यानुसार जिल्हभरातील तब्बल शंभरावर डॉक्टरांनी प्रशासनाकडे अर्जही केले होते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त अर्जांची छाननी करून शासनाकडे पाठविल्याचे समजते. परंतु, अद्याप एकही पद भरण्यात आलेले नाही. त्यामुळे रिक्त जागांवर डॉक्टरांची नियुक्ती होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.
वाशी तालुक्याची अवस्था तर अत्यंत विदारक बनली आहे. पारा आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर नाही. पारगाव आरोग्य केंद्रातील एक जागा रिक्त आहे. त्यामुळे पारा आरोग्य केंद्राचा पदभार द्यायचा म्हटले तरी डॉक्टर उपलब्ध नाहीत. तालुक्याचा विचार करता केवळ एकच डॉक्टर सध्या कार्यरत आहेत.
प्राथमिक अरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. परंतु, आज आठ पैकी केवळ उस्मानाबाद, वाशीसह तीनच तालुक्यांची पदे भरलेली आहेत. उर्वरित पाच तालुक्यांना कोणीही वाली नाही. याचा परिणाम आरोग्य केंद्रांच्या कारभारावर झाल्याचे बालले जाते.
गरजेच्या तुलनेत फारच कमी डॉक्टर
४याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांच्याशी संपर्क साधला असता, गरजेच्या प्रमाणात फारच कमी डॉक्टर उपलब्ध होत आहेत. जवळपास सात आरोग्य केंद्रात एकही डॉक्टर उपलब्ध नाही. पर्यायी सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी सदरील उपाययोजना तोकड्या पडत आहेत. जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच डॉक्टर उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Seven health centers without doctors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.