सेवाशुल्क वाढले; सुविधांचे काय ?
By Admin | Updated: December 30, 2015 00:43 IST2015-12-30T00:40:32+5:302015-12-30T00:43:46+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळातच आरोग्य सेवा महाग करुन शासनाने गोर-गरीबांची थट्टा मांडली आहे. आरोग्य सेवा महागली मात्र सुविधांचे काय? असा प्रश्न आता रुग्णांच्या नातेवाईकांनीच उपस्थित केला आहे

सेवाशुल्क वाढले; सुविधांचे काय ?
व्यंकटेश वैष्णव , बीड
दुष्काळातच आरोग्य सेवा महाग करुन शासनाने गोर-गरीबांची थट्टा मांडली आहे. आरोग्य सेवा महागली मात्र सुविधांचे काय? असा प्रश्न आता रुग्णांच्या नातेवाईकांनीच उपस्थित केला आहे. तर काही सामाजिक संघटनांनी शासन निर्णयाचा धिक्कार करत दुष्काळात होरपळणाऱ्या जिल्हयात मोफत आरोग्य सेवा द्या.. अशी मागणी केली आहे. तीनशे खाटांच्या रुग्णालयात दररोज चारशेवर रुग्ण उपचार घेतात. मात्र या रुग्णांच्या खिशांचेच आता आॅपरेशन होत आहे.
आरोग्य सेवा महागली अन् दुष्काळात होरपाळणाऱ्यां रुग्णांच्या आजारा ऐवजी खिशांचेच ‘आॅपरेशन’ करणारे धोरण शासनाने आवलंबले. झालेली शुल्कवाढ ही दुपटीने झाल्याने रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नव्या निर्णयाची नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारी पासून जिल्हा आमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा दुपटीने महाग करण्याचा निर्णय तर घेतला मात्र जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांचे काय, असा सवाल उपस्थित केला आहे. जिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णाला चांगली आरोग्य सेवा अगोदर द्या नंतर शुल्क वाढवा अशा संतप्त प्रतिक्रीय रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. मागील तीन वर्षापासून बीड जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. तीन वर्षात एक रुपयाचे उत्पन्न शेतीतून मिळाले नाही. स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत नाही. यामुळे अनेक प्रकारच्या आजाराला निमंत्रण मिळते. अशा बिकट परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा शुल्क वाढविले आहेत. दुष्काळी परिस्थितीत आरोग्य सेवेचे शुल्क वाढविणे म्हणजे गोरगरीबांच्या खिशावरच दरोडा टाकण्याचा प्रकार आहे. अशा संतप्त प्रतिक्रीया बीड जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत येण्यासाठी पैसे नसतात. अशा परिस्थितीत शासनाने आरोग्य सेवेच्या शुल्कात वाढ करुन आमची थट्टाच केली असल्याचे धानोरा येथील रुग्णाचे नातेवाईक सुरेश जोगदंड म्हणाले.
रुग्णाची तपासणी केल्या नंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चार प्रकारच्या गोळ्यांपैकी दोन गोळया रुग्णांना खाजगी मेडीकलवरुन खरेदी कराव्या लागतात. ही वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत रुग्ण जिल्हा रुग्णालयाकडून मिळेल त्या सुविधेला मानून घेतात. मात्र आता शासनाने सुविधा न देताच विविध बाबींसाठी शुल्क वाढविल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला.
अशी आहे शुल्क वाढ (रूपयात)
सुविधाजुने दरनवे दर
अतिदक्षता विभाग१००२००
सीटी स्कॅन२००४००
मेजर शस्त्रक्रिया१६०५००
भूल व शस्त्रक्रिया१६०५००
(मोठी)
भूल व शस्त्रक्रिया६०२००
(छोटी)
रुट कॅनल ट्रिटमेंट१००२००
चांदी भरणे१५६०
दुसरे बाळांतपण००१५०
चिकित्सालयीन विभागात दाखल झालेल्या रुग्णाला जर आॅक्सीजनची गरज असेल तर तर प्रत्येक दिवसाला शंभर रुपये प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय इ.सी.जी. साठी ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार १ जानेवारी पासून उपचार शुल्क वाढीची आमलबजावणी करण्यात येईल. रुग्णांकडील रेशनकार्ड पास वर्षातील अथवा रिनिव्ह केलेले असणे आवश्यक आहे.
- डॉ. अशोक बोल्डे
जिल्हा शल्यचिकित्सक
दुष्काळाने संपूर्ण जिल्हा हैरान आहे. शासनाने आरोग्या सारख्या अत्यावश्यक सेवेचे शुल्क दुपटीने वाढविल्याने गोर-गोर गरीबांंसाठी दुष्काळात तेरावाच आहे.
- फकीर पठाण
रूग्णांचे नातेवाईक, नाळवंडी
मराठवाडा व जिल्हा दुष्काळाने मेटाकुटीला आलेला आहे. अशा परिस्थितीत सरकारी आरोग्य सेवेचे दर वाढविणे मुळातच चुकीचे आहे. सरकारी दवाखाण्याचे उपचार दर वाढले तरी आम्ही खाजगी रुग्णालय उपचार शुल्क वाढविणार नाहीत. असे बालरोग तज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले.