विमान आणि उद्योग क्षेत्रात खळबळ
By Admin | Updated: August 1, 2016 00:07 IST2016-07-31T23:55:26+5:302016-08-01T00:07:17+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

विमान आणि उद्योग क्षेत्रात खळबळ
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक आलोक वार्ष्णेय लाचप्रकरणी ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्याने विमान आणि उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील त्यांच्या अवघ्या वर्षभराच्या कार्यकाळात कारवाई झाल्याने अनेकांचा त्यावर विश्वास बसला नाही. शिवाय विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
डी.जी. साळवे यांची बदली झाल्यानंतर जुलै २०१५ मध्ये चिकलठाणा विमानतळाच्या संचालकपदावर आलोक वार्ष्णेय यांची बदली करण्यात आली. वार्ष्णेय यापूर्वी दिल्ली येथील विमानतळाच्या संचालकपदी कार्यरत होते. विमानतळावरून कार्गो सेवा, औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा, वायफाय सुविधा, रेस्टॉरंट सेवा आणि नव्या विमानसेवेसाठी प्रयत्न यामुळे ते कायम चर्चेत राहिले.
मात्र त्याच वेळी त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. विमानतळावर टॅक्सी सेवा सुरू करण्यावरून टॅक्सी संघटना आणि प्राधिकरणात धुसफूस सुरू होती. आधीच एका कंपनीतर्फे सेवा सुरू असताना पुन्हा दुसऱ्यास सेवेस मंजुरी देणे अडचणीचे असल्याचे वार्ष्णेय यांचे म्हणणे होते, तर ही सेवा सुरू करण्यास मंजुरी द्या, त्यासाठी आवश्यक वाटल्यास निविदा प्रक्रिया करावी, असे संघटनेचे म्हणणे होते.
यावरून गेल्या काही दिवसांपासून संघटना आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली होती.
गिफ्ट म्हणून गाडी?
वार्ष्णेय ‘सीबीआय’च्या जाळ्यात सापडल्यानंतर काही जण त्यांच्या कार्यपद्धतीवर चांगलीच टीका करीत आहेत. अनेक कामांसाठी ते जाणीवपूर्वक अडवणूक करीत होते.
४देवाणघेवाण केल्यानंतरच त्यावर तोडगा निघत होता. त्यांना एका कंत्राटदाराने गिफ्ट म्हणून चारचाकी गाडीची आॅफर दिल्याची चर्चा यानिमित्ताने समोर आली आहे.
पदभार शरद येवले यांच्याकडे
आलोक वार्ष्णेय यांच्यावरील कारवाईमुळे आता उपमहाप्रबंधक शरद येवले यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त पदभार येणार आहे, अशी माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.