टंचाईच्या काळात पाणी विकणे अधर्म
By Admin | Updated: February 8, 2016 00:20 IST2016-02-08T00:04:39+5:302016-02-08T00:20:17+5:30
हणमंत गायकवाड , लातूर पाणी नैसर्गिक गरज आहे़ वास्तविक पाहता पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याच्या वस्तू नाहीत़ मानव निर्मितही नाहीत, निसर्गनिर्मित आहेत़

टंचाईच्या काळात पाणी विकणे अधर्म
हणमंत गायकवाड , लातूर
पाणी नैसर्गिक गरज आहे़ वास्तविक पाहता पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याच्या वस्तू नाहीत़ मानव निर्मितही नाहीत, निसर्गनिर्मित आहेत़ त्यामुळे टंचाईच्या काळात पाणी विकणे अधर्मच आहे़ दुसऱ्याच्या दु:खाने दु:खी होऊन त्याला मदत करणे हा खरा मानव धर्म आहे़ सध्या पाण्याची अडचण आहे़ या अडचणीत पाण्याचा व्यवसाय करुन पैसा कमाविणे हे अधर्मच आहे़ तो कोणीही करु नये, असा उपदेश लातुरातील धर्मगुरुंनी दिला आहे़
जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ टंचाईचा फायदा घेत पाणी विक्रेत्यांनी जिल्हाभर मोठा व्यवसाय थाटला आहे़ त्यातून लाखो रुपयांची नफेखोरी केली जात आहे़ दिवसाला ४० लाखांपर्यंत पाण्याचा व्यवहार होत आहे़ सामान्य नागरिकांना पाणी विकत घेणे परवडत नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धर्मगुरुंशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पाणी निसर्गनिर्मित आहे़ ती विकण्याची वस्तू नाही़ संकटकाळी पाणी एकमेकांना दिले पाहिजे़ अडचणीच्या काळात हा व्यवसाय होणे माणुसकीला धरुन नाही, असे संत वचनच धर्मगुरुंनी आपल्या हितोपदेशात सांगितले. मोफत पाणीपुरवठ्याचा संदेशच सर्वधर्मीय गुरुंनी दिला आहे.
गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, संत एकनाथ महाराज गंगेवरुन पाणी घेऊन देवाची पूजा करण्यासाठी निघाले होते़ वाटेत एक गाढव पाण्याअभावी तडफडत होते़ संत एकनाथ महाराजांनी देवाला घेतलेले पाणी त्या गाढवाला पाजले आणि त्याचे प्राण वाचविले़ आज अशीच परिस्थिती आहे़ पाण्याची गरज सर्वांनाच आहे़ ज्याच्याकडे पाणी आहे, त्याने दुसऱ्याला दिलेच पाहिजे़ सर्व्हिस म्हणून नव्हे तर सेवा म्हणून ते दिले पाहिजे़ इतकी वर्षे आपण पाणी विक्री केली़ त्यावेळची परिस्थिती चांगली होती़ आता परिस्थिती चांगली नाही़ त्यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय करणे अधर्मच आहे़ जो लोकांचा त्रास जाणतो आणि मदत करतो तोच खरा माणूस आणि मानवधर्म आहे़ माणूस अडचणीत असतो, त्यावेळी जो अडचण सोडवितो ती त्याची खरी सेवा़ मूल्य घेऊन सेवा देणे म्हणजे सर्व्हिस आहे़ पाणी विक्रीतून सर्व्हिस देण्याऐवजी मोफत देऊन सेवा करा, हीच खरी ईश्वर सेवा ठरेल, असेही गहिनीनाथ महाराज म्हणाले़ सेवा म्हणजे परमार्थ आहे़ आता पाण्याची टंचाई आहे़ अशा काळात ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी परमार्थ करावा, असेही गहिनीनाथ महाराज म्हणाले़
डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर म्हणाले, टंचाईच्या काळातच काय, भरपूर पाणी असतानाही पाण्याचा व्यवसाय करणे चुकीचे आहे़ पाणी, अग्नी, वायू या निसर्गनिर्मित बाबी आहेत़ त्या विकण्याचा कोणालाही अधिकार नाही़ निसर्गाने सर्व जीवांसाठी त्याची निर्मिती केली आहे़ मानव निर्मित या बाबी नाहीत़ त्यामुळे पाणी विकू नये़ विकले तर तो अधर्मच आहे़ माणूस, प्राणी, सर्वच जीवघटक आज पाण्यासाठी त्रस्त आहेत़ अशा स्थितीत गैरफायदा घेऊन पैसा कमाविण्यासाठी हा व्यवसाय करणे चुकीचे आहे़ शास्त्रात याला योग्यता नाही़ म्हणून जे कोणी पाण्याचा व्यवसाय करुन पैसा कमावीत असतील त्यांनी तो थांबवावा़ ज्यांच्याकडे पाणी असेल तर त्यांनी मोफत देऊन सेवा करावी, हाच आपला धर्म आहे़ हीच ईश्वर सेवा आहे़ या सेवेपेक्षा दुसरी कोणतीही सेवा मोठी नाही, असेही डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले.
पाणी अल्लाहची देण आहे़ पाणी विकणे आणि पाण्याचा व्यवसाय करणे गैर आहे़ पाणी सेवाभावी वृत्तीने मोफत दिले जावे़ जर एखाद्याकडे पाणी असून पोहोचविण्याची ऐपत नसेल तर तो वाहतुकीचा नाममात्र खर्च घेवू शकता़े प्रेषित मुहम्मद पैगम्बरांच्या काळात पाण्याची टंचाई जाणवली होती़ तेव्हा त्यांनी हजरत उस्मान गणी रजी़ यांना एका यहुदी व्यक्तीकडे असलेली विहीर (बीरे रूहा) घेण्यास सांगितले होते़ तेव्हा तो यहुदी व्यक्ती विकण्यास तयार नव्हता, त्याला त्यापासून भरपूर फायदा मिळायचा़ परंतु, गणी यांनी त्यांना अर्धी विहीर विकत देण्याची मागणी केली़ तेव्हा तो राजी झाला़ एक दिवस तो व्यक्ती पैशाने पाणी विकायचा आणि दुसऱ्या दिवशी हजरत उस्मान गणी मोफत पाणी द्यायचे़ नागरिक मोफत पाण्याच्या दिवशी पूर्ण पाणी भरून घ्यायचे. दुसऱ्या दिवशी ते पाणी घेत नसत़ त्यानंतर त्याने कंटाळून हजरत उस्मान गणी रजि़ यांना ती पूर्ण विहीर विकली़ आणि त्या शहरात पाणी मोफत दिले़ ती विहीर आजही सौदीअरबमधील मदिना शहरात आहे. आज टंचाई आहे. विकत नाही, तर मोफत पाणी दिले पाहिजे, असे मौलाना मुफ्ती अब्दुल जलील म्हणाले.