अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात !
By Admin | Updated: March 30, 2015 00:41 IST2015-03-30T00:31:47+5:302015-03-30T00:41:23+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विशेषत: खून व बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा ढवळून निघत आहे़

अल्पवयीन मुलींची सुरक्षा धोक्यात !
लातूर : लातूर जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ विशेषत: खून व बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण जिल्हा ढवळून निघत आहे़ अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार चिंतेची बाब बनली आहे़ काटगाव, दापेगाव, मुरुडच्या लाजीरवाण्या घटनांनी काळीमा फासला आहे़ वलांडीतील मुख्याध्यापकाच्या खून प्रकरणातील एक आरोपी व काटगाव बलात्कार प्रकरणातील संस्थाचालक अद्यापही मोकाटच असल्याने लातूरच्या पोलिसांवर दडपण वाढलेले आहे़
लातूर तालुक्यातील काटगाव येथील साने गुरुजी आश्रमशाळेचा संस्थापक लातूरच्या पोलिसांना गुंगारा देऊन बेपत्ता झाला आहे़ गेल्या चार दिवसांपासून त्याचा शोध घेण्यात लातूरचे पोलिस असमर्थ ठरले आहेत़ तसेच देवणी तालुक्यातील वलांडी येथील मुख्याध्यापकाचे प्रेत लातूरच्या एलआयसी कॉलनी भागात सापडले़ या खून प्रकरणातील एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही़ तसेच ग्रामीण भागातही खोलवर पाळेमुळे रोवलेल्या मटका जुगारांवर नियंत्रण ठेवण्यातही त्या-त्या ठाण्यातील पोलिस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेतील पोलिसांच्या कारवायावरुन दिसत आहे़ अवैध धंदे चालू आहेत की नाहीत, याची माहिती त्या-त्या ठाण्यातील पोलिसांना दिसत नाहीत़ काही ठिकाणी तर गुन्हेगार व पोलिसांचीच छुपी मैत्री त्या-त्या परिसरातील हॉटेल व पानपट्ट्यांवर उजागर होत असते़ त्यामुळे नवीन गुन्हेगारी पिढी उदयास येत आहे़
लातूर जिल्ह्यात काटगाव, दापेगाव, मुरुड येथील घटनांकडे पाहिले असता निराश्रीत अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना पाठीशी कोण घालत आहे, याचाही तपास करावे लागते़ दहा-बारा वर्षांच्या चिमुकल्या कळ्यांना खुडण्याचे काम करणाऱ्या आरोपींवर कोणाचाही धाक राहिलेला नाही़ २५ मार्च रोजी काटगाव येथील साने गुरुजी आश्रमशाळेतील १२ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला़ त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी २७ मार्च रोजी औसा तालुक्यातील दापेगाव येथील ११ वर्षीय मुलीवर घराजवळील नराधमाने बलात्कार केला़ तसेच मुरुड येथील १५ वर्षीय मुलीवरही बलात्कार झाल्याची घटना २७ मार्च रोजी उघडकीस आली़ याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे़