साडेपाच वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:04 IST2021-03-01T04:04:42+5:302021-03-01T04:04:42+5:30
औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही ...

साडेपाच वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही रेल्वे स्टेशनचा दुसरा टप्पा कागदावरच
औरंगाबाद : माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील इमारतीचे साडेपाच वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. परंतु प्रत्यक्षात काम काही झालेच नाही. त्यातच आता एकेरी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे लवकरच रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. पण साडेपाच वर्षांपूर्वींचे काम अजूनही कागदावरच आहे, त्यामुळे हे नवे काम तरी प्रत्यक्षात कधी होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
औरंगाबाद रेल्वे स्टेशनचा माॅडेल रेल्वे स्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात सध्याची भव्य इमारत उभी राहिली. माॅडेल रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात जुन्या इमारतीचा विकास केला जाणार आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले. परंतु साडेपाच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही.
रेल्वे स्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे केवळ ‘बोलाचा भात’ ठरते आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर लवकर रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते एकेरी मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर सध्या विविध कामांचा धडाका सुरू आहे. जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी करून दुरवस्थेवर केवळ वरवर पांघरूण घालण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासंदर्भात सध्या काही माहिती देता येणार नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले.
केवळ आश्वासन; प्रत्यक्षात काही नाही
रेल्वेकडून केवळ आश्वासनं दिली जातात. हे सर्वेक्षण सुरू आहे, असे सांगितले जाते. भूमिपूजन केले जाते. प्रत्यक्षात काही होत नाही. छोट्या-छोट्या रेल्वे स्टेशनचा विकास केला. परंतु आपल्या स्टेशनचा विकास का करत नाही, असा प्रश्न आहे. लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे केवळ काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
- खासदार इम्तियाज जलील
फाेटो ओळ...
रेल्वेमंत्र्यांच्या दौऱ्यांच्या तोंडावर रेल्वे स्टेशनच्या जुन्या इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.